पुणे (अविनाश ढगे) -राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सरासरी 75 टक्के बस सध्या विविध मार्गांवर धावत आहे. हे प्रमाण पाहता करोनापूर्वीच्या तुलनेत या बसची संख्या तब्बल दोन हजारांनी घटली आहे. यातील बहुतांश बसेस जुन्या झाल्याने त्या थेट भंगारात पाठवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बससंख्या घटल्यामुळे ग्रामीण भागांत बऱ्याच ठिकाणी अजूनही एसटी सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची एसटीशी असलेली नाळ तुटली आहे.
करोनापूर्वी राज्यात एसटीचे वार्षिक प्रवासी 220 कोटी होते. ही संख्या आता फक्त 120 कोटींवर आली आहे. तर, करोनापूर्वी महामंडळाचे दिवसाचे उत्पन्न सरासरी 22 ते 24 कोटी रु. होते. आता ते 13 ते 14 कोटी रुपयांवर आले आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्यामुळे एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांना वेतनाचा खर्च भागवणेही महामंडळाला जड झाले आहे.
करोनापूर्वी म्हणजेच 2019-20 मध्ये 15 हजार 764 बस मार्गावर धावत होत्या. तर, करोना काळात 6 हजार 688 बस सुरू होत्या. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला. तो तब्बल 6 महिने चालला. या काळात एकही बस मार्गावर धावली नाही. आत परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. पण, अद्याप एसटी बसेसची संख्या कमी असल्याने त्याचे “साइडईफेक्ट’ आता दिसत असून, प्रवासी संख्या आणि उत्पन्न निम्म्यापेक्षा अधिक घटले आहे.
कोविड काळात एसटी बंद असल्यामुळे प्रवासी घटले. आता प्रवासी वाढत आहेत. तसेच महामंडळाने नवीन बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. भविष्यात मार्गांवर बसेसची संख्या वाढणार आहे. प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– शेखर चन्ने, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ
आयुर्मान पूर्ण झालेल्या 6 हजार एसटी बस
एसटीच्या ताफ्यात सध्या एकूण 16 हजार बस आहेत. यातील 12 वर्षांचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बसची संख्या 6 हजार 289 इतकी आहे. परिवहन विभागाने प्रवासी सुरक्षितता लक्षात घेता मुंबईत आठ वर्षे आणि राज्यात 12 वर्षे प्रवासी गाड्यांचे आयुर्मान निश्चित केले आहे. त्यामुळे भविष्यात सहा हजारांहून अधिक एसटी बस कमी होण्याची शक्यता आहे.
एसटीची राज्यातील स्थिती
एकूण डेपो
236
बसची आवश्यकता
19 हजार
उपलब्ध बस
14,800