पुणे – खडकवासला धरणासाखळीत 73 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. तसेच पुढील दोन महिने पावसाळा असल्याने शहरात आठवड्यातून एक दिवस सुरू असलेली पाणी कपात रद्द केली जाण्याची शक्यता आहे. धरणांतील पाण्याची सद्यस्थिती तसेच पाणीकपात रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलवली आहे. त्यामुळे निर्णय झाल्यास पुणेकरांना पूर्वीप्रमाणेच सातही दिवस पाणी मिळणार आहे.
खडकवासला धरणसाखळीत मे महिन्यात कमी पाणीसाठा होता. त्यातच हवामान विभागाने मान्सून उशिरा येण्यासोबतच जुलै आणि ऑगस्टमध्ये दरवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे महापालिकेने 18 मेपासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता धरणसाठा 75 टक्के झाल्याने तसेच खडकवासला धरणातून कालवा आणि मुठा नदीत जादा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हे पाणी महापालिकेस द्यावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थासह, सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. पाणीकपात रद्द करण्याबाबत महापालिकेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
कपात कायम ठेवावी : पालिका प्रशासन
धरणांचा पाणीसाठा 73 टक्क्यांपेक्षा जास्त गेला आहे. पण, पालिका प्रशासन मात्र संभ्रमावस्थेत आहे. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला असला, तरी ऑगस्टमधील पावसाची वाट पाहून पाणी साठा 85 टक्क्यांवर गेल्यावर कपात मागे घ्यावी, असे पालिकेचे मत आहे. तर एक दिवस पाणी बंद ठेवल्याने देखभाल दुरूस्ती तसेच इतर आवश्यक कामे करता येतात. त्यामुळे आणखी काही दिवस ही कपात कायम ठेवण्याबाबत प्रशासन आग्रही आहे.
“चांगला पाऊस झाल्याने धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. हे पाहता, दर गुरुवारची पाणीकपात रद्द करून सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मनपा आयुक्तांना दिले आहे”. – आदित्य माळवे, माजी नगरसेवक, भाजप