परिंचे – काळदरी (ता. पुरंदर) खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. भात लागवडीसाठी चिखलणी, रोग उपटणे, भात लावणीची लगबग सुरू आहे. पावसाने दडी मारल्यामुळे या परिसरातील भात लागण्याची कामे खोळंबली होती. गेल्या पंधरा दिवसात समाधानकारक पाऊस सुरू झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ओढ्या, नाल्यांमध्ये पाणी आले असून भात खाचरांना पाणी फुटल्याने भात लावणीच्या कामे सुरू झाली असल्याचे शेतकरी स्वागत कोंढाळकर यांनी सांगितले.
भात रोपे टाकण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने भात रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला रोपांची कमतरता भासत असल्याचे धनकवडी येथील शेतकरी संजय ताकवले यांनी सांगितले. मांढर परिसरात बहुतेक भात खाचरामध्ये पाणी साठले नसून भात रोपे लागणी अवस्थेत आली नसल्याने या परिसरात तुरळक ठिकाणी भात लागणीची कामे सुरू झाली असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष तानाजी पापळ यांनी सांगितले आहे.
इंद्रायणी तांदळाला शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल इंद्रायणीच्या लागवडीवरती जास्त आहे. इंद्रायणीबरोबर इंडम कर्जत जाती मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. युनाईटेड वे मुंबई या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभ्युदय प्रकल्पा अंतर्गत काळदरी परिसरातील शेतकऱ्यांना भात बियाणाचे वाटप करण्यात आले होते. बियाणे पेरून भात रोप तयार झाल्यानंतर (एसआरआय पद्धतीने) दोरीवरील भात लागवडीस सुऱ्य्वात केली असल्याचे अभ्युदय प्रकल्प समन्वयक किरण इंगळे यांनी सांगितले.
भलरीची गाणी म्हणत…
भात लागवड करणे हा आनंदाचा दिवस मानून भात लावताना भलरीची गाणी म्हणत बळीराजाला चांगले उत्पन्न मिळण्यासाठी देवाला विनवणी केली जात असल्याचे भात लागवड करणाऱ्या शेतकरी महिलांनी सांगितले. यावेळी द्वारकाबाई कोंढाळकर,निशा ढवळे, अमृता जानकर, जयश्री जानकर, आशा ढवळे, तारा कोंढाळकर, राजश्री पेटकर, तारा रांजणे, चंद्रभागा कोंढाळकर, संजय हुंबे, अनिल जानकर आदी शेतकरी उपस्थित होते.