विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – करोना झालेल्या अनेक जणांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी अनेकजण सरसावलेले आपण पाहिले. मात्र निसर्गनिर्मित ऑक्सिजन मिळावा याकरिता वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे.
वृक्षारोपण करताना केवळ शोभेची झाडे लावण्यापेक्षा मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. त्याच उदात्त हेतूने आगामी काळात पुणे शहर व जिल्ह्यातील विविध भागात दहा हजार पिंपळवृक्ष रोपांची लागवड करण्याचा संकल्प केल्याचे बसपाचे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी सांगितले.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त बहुजन समाज पक्षाच्यावतीने येरवडा येथील जेलरोड परिसरात पिंपळवृक्षाच्या (बोधीवृक्ष) रोपांची लागवड करून त्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चलवादी बोलत होते. याप्रसंगी बसपाचे महासचिव सुदीप गायकवाड, जिल्हा सचिव प्रशांत वावरे, पुणे शहर प्रभारी रमेश गायकवाड, प्रशांत कसबे, नागेश चाबुकस्वार, सुमेध सोनवणे, निलेश धिवार, सतिष सोनवणे उपस्थित होते.
पुढे बोलताना चलवादी म्हणाले की, तथागत गौतम बुद्धांनी राजपाटाचा त्याग करून उरूवेला येथे बोधी वृक्षाखाली संबोधी प्राप्त केली. याच वृक्षाखाली त्यांना सत्याचा मार्ग सापडला व बुद्धत्व प्राप्त झाले. पिंपळवृक्षाला बोधीवृक्ष संबोधले जाऊ लागले. पिंपळवृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायू (ऑक्सीजन) याची निर्मिती करत असतो. त्यामुळे या वृक्षाचे मोठ्या प्रमाणात रोपण व जतन केले पाहिजे. त्याचमुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत (३१डिसेंबरपर्यंत) १० हजार पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केल्याचे चलवादी म्हणाले.
येरवडा : येथील जेलरोड परिसरात पिंपळवृक्ष रोपांची लागवड करताना हुलगेश चलवादी व पदाधिकारी