पुणे, दि. 11 – नदी अविरल आणि निर्मळ राहण्यासाठी झटणारा कार्यकर्ता डॉक्टरइतकाच महत्त्वाचा असतो. आपण प्रदूषित पाण्याने आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो. पण, पाणी प्रदूषितच होऊ नये आणि कोणी आजारीच पडू नये यासाठी झटणारे नदीप्रेमी महत्त्वाचे काम करत असतात, असे विचार “जलबिरादरी’चे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुघ यांनी व्यक्त केले.
“माझी राम नदी’ या वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरी उद्घाटन चुघ यांच्या उपस्थितीत झाले. “किर्लोस्कर न्युमॅक्टिक कंपनी लिमिटेड’ ने याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला समन्वयक वीरेंद्र चित्राव, उपक्रमाचे संयोजक अनिल गायकवाड शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी प्रतिमा कुलकर्णी, सागर मित्र चे विनोद बोधनकर, रमेश करमरकर, सुवर्णा भांबुरकर उपस्थित होते.
“राम नदी पुनरुज्जीवन’ अभियानाच्या वतीने राम नदीच्या काठावरील 25 शाळा दत्तक घेण्यात आल्या असून, नदी संवर्धनासाठी सुमारे दीड लाख मुलांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रेरित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांमधून राम नदीची ओळख करून देणारी दृक श्राव्य व्याख्याने गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. “माझी राम नदी’ या विषयी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यापैकी प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची अंतिम फेरी घेण्यात आली. राम नदी पुनरुज्जीवनासाठी शालेय विद्यार्थ्यांनी सक्रिय होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आम्ही 40 कलमी कार्यक्रम तयार केला असून, शिक्षकांच्या मदतीने तो यशस्वी करण्यासाठीची योजना तयार करण्यात आल्याचे चित्राव म्हणाले. वक्तृत्व स्पर्धेप्रमाणे आगामी काळात राम नदीला पत्र, चित्रकला स्पर्धा, परसबागेची कार्यशाळा आणि टाकाऊमधून टिकाऊ इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाले.