कोंढवा- कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बसविलेले वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) संबंधित प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. सिग्नलसाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. सिग्नल बसविल्यापासून ते सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. येथे सिग्नल बसविलेच कशासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
मंतरवाडी बाह्यवळण मार्ग व कोंढवा-येवलेवाडी मार्ग यांना जोडणारा कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. या ठिकाणी दररोज तासन्तास जीवघेणी वाहतूक कोंडी होऊल छोटे-मोठे अपघात घडत आहेत. ही वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी महापालिकेने वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) बसविले होते. यातून चौकातील वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, वाहतूक पोलीस विभाग व पालिका प्रशासन यांच्या अनास्थेमुळे हे सिग्नल बसविल्यासून अनेक महिने बंदच आहेत. यामुळे अनेक बेशिस्त वाहनचालक वाहने आडवी-तिडवी चालवून वाहतूक ठप्प करीत आहेत. वाहतूक पोलीस नसल्यास येथे तासन्ंतास भीषण वाहतूक कोंडी होते.तसेच छोटे-मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. हजारो अवजड वाहनांची कात्रज बाह्यवळण मार्गावरुन वर्दळ अहोरात्र सुरु असते, त्यामुळे शाळकरी मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरीक यांना तर या चौकातून रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यामुळे या चौकातील सिग्नल तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करुन वाहतुककोंडी सोडवावी अशी मागणी वाहनचालक व नागरीकांनी केली आहे.