पुणे -खडकवासला धरणातून कालव्यातून सोडले जाणारे पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणारा कचरा यामुळे पाणी प्रदूषित होते ही वेगळीच समस्या. यासर्व पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी हा 25 किलोमीटर लांबीचा बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेचा प्रारूप प्रकल्प अहवाल सल्लागार कंपनीकडून जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाची छाननीचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू करण्यात आले आले असून लवकरच तो अंतिम मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार असून हे जादा पाणी शहरासाठी तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी देणे शक्य होणार आहे. खडकवासला धरणातून कालव्यात जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यासर्व पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी हा 25 किलोमीटर लांबीचा बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून आखण्यात आली आहे. त्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती जलसंपदा विभागाकडून करण्यात आली होती. या कंपनीकडून माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते.
किफायतशीर ठरणार प्रकल्प
कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. जरी नवीन धरण बांधायचे झाल्यास भूसंपादन, पुनर्वसन अशा अनेक गोष्टी आहेत. साधारणत: एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारणे यासाठी सुमारे हजार कोटींचा खर्च येतो. अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात. 25 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच त्यामुळे बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्टया व्यवहार्य किफायतशीर ठरणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.