पुणे, दि. 23 -राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढल्यानंतर या निर्णयावरून राष्ट्रवादी कॅंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. प्रभाग रचना तसेच निवडणुकांसाठीची सदस्य संख्या कमी केल्याने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिकांची सुनवाणी प्रलंबित असताना अशा प्रकारे आदेश काढून शिंदे-भाजप सरकारकडून लोकशाहीचा खून केला असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. तर शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली कामे, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी विकासकामांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली असून, पराभूत मानसिकतेतून त्यांचे शहर अध्यक्ष न्यायालयात जाण्याची भाषा करीत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
निवडणुकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, येणाऱ्या 28 नोव्हेंबर रोजी याची अंतिम सुनावणी होऊन निकाल येणे अपेक्षित आहे. असे असताना काल राज्य सरकारने रडीचा डाव खेळत नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले आहेत. ही बाब निश्चितच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. आज सकाळी याबाबत आम्ही सर्व पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयाच्या ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. लोकशाहीच्या रचनेत निवडणुकींना विशेष महत्त्व असून, नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार शिंदे-फडणवीस सरकार करत आहे.
प्रशांत जगताप, रा.कॉं. शहराध्यक्ष
महापालिकेची प्रभाग रचना कशीही झाली, तरी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा भाजपला ठाम विश्वास आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक हद्दींची तोडफोड करून त्यांच्या सोयीने केलेली प्रभाग रचना आम्ही स्वीकारली होती. आम्ही रडीचा डाव खेळून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नव्हते. गेल्या काही दिवसांत राज्यात आणि देशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे पुण्याच्या विकासकामांना खीळ बसली. निवडणुकांना सामोरे जाण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला भिती वाटते.
जगदीश मुळीक, भाजप, शहराध्यक्ष