सातारा -कराड येथे आयोजित 17 व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन तसेच जिल्हा कृषी महोत्सवात होणाऱ्या पीक, फळे, फुले, फळभाज्या, पालेभाज्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मॉडेल, जिल्ह्यातून आलेल्या विविध पिकांचे नमुने, पीक स्पर्धा दालन स्टॉलला देणाऱ्या येणाऱ्या बक्षीसांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी घेतला आहे. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समिती, कृषी विभाग महाराष्ट्र शासन,
जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शन व कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विविध पिकांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम यावर्षी वाढवण्याचा निर्णय प्रशासक खिलारी यांनी घेतला. दि. 24 रोजी ऊस पीक स्पर्धा तर दि. 25 रोजी केळी घड स्पर्धा, दि. 26 रोजी विविध फुले स्पर्धा, दि. 27 रोजी फळे स्पर्धा, दि. 28 रोजी फळभाज्या, भाजीपाला स्पर्धा होणार असून या सर्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5001 रुपये, द्वितीय 3101, तृतीय क्रमांकास 2001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.