पुणे, दि. 23 -राज्य शासनाने महापालिकेस नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही रचना करताना जानेवारी 2021 मध्ये आघाडी सरकारने प्रभाग रचनेसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकांना देण्यात आल्या आहेत. जानेवारीत काढलेल्या अध्यादेशानुसार, प्रभाग तीन सदस्यांचे करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचना करायची झाली तरी ती तीन सदस्यांची असणार आहे. दरम्यान, या आदेशाबाबत महापालिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्य निवडणूक विभागाने उद्या (गुरुवारी) ऑनलाइन बैठक बोलविली आहे. या बैठीकीनंतरच प्रभाग रचनेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यु. एस. मदान यांनी ही बैठक बोलविली आहे.
महापालिका निवडणुकांसाठी किती सदस्यांचा प्रभाग असावा, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडीत मतभिन्नता होती. चार सदस्यांच्या प्रभागात भाजपला फायदा होत असल्याने दोन सदस्यांचे प्रभाग असावेत, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची व कॉंग्रेसची दोन सदस्यांचा वॉर्ड करावा अशी, मागणी होती. तर शिवसेनेच्या वतीने तत्कालीन नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची चार सदस्यांचा प्रभाग असावा, अशी मागणी होती. त्यामुळे महाविकास आघाडीने मध्यम मार्ग स्वीकारत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. तर, न्यायालयानेही या संख्येनुसारच निवडणूक घेण्याच्या सूचना मार्च 2022 मध्ये दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी ओबीसी आरक्षणास न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीचे अधिकारच स्वत:कडे घेतले होते. मात्र राज्यातील नवीन सरकारने आघाडीने निश्चित केलेली सदस्य संख्या कमी केली असली तरी, प्रभाग रचनेसाठी तीन सदस्यांचा घेतलेला निर्णय कायम ठेवला असून, त्यानुसार प्रभाग रचना करण्याच्या सूचना पालिकांना देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रभाग रचना तीन सदस्यांचीच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आज होणार तातडीची बैठक
शासनाच्या आदेशात केवळ प्रभाग रचना नव्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रभाग चार सदस्यांचा की तीन सदस्यांचा याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना नाही. तसेच ज्या महापालिका याबाबत शासनाकडे, तसेच निवडणूक आयोगाकडे या चौकशी करत आहेत. या प्रश्नांच्या भडीमारानंतर राज्याच्या नगरविकास विभागाकडून जानेवारी 2021 चा तीन सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना करण्याचा आघाडी सरकरचा अध्यादेश पाठविला जात आहे. त्यामुळे महापालिकांमधे संभ्रम निर्माण झालेला असल्याने प्रभाग रचनेचा संभ्रम दूर करण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त स्वत: सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीत प्रभाग रचनेबाबत स्पष्टता येणार आहे.