पुणे -शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. याविरोधात आजपासून रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यावर रिक्षा संघटना ठाम असल्याची माहिती रिक्षा संघटनांनी दिली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारा रिक्षा संघटनांच्या प्रमुखांना बंडगार्डन पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
शहरात सुमारे 20 ते 25 हजार बाईक-टॅक्सी सुरू असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नागरिक स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रात बाइक-टॅक्सीला परवानगी नाही. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. शहरात 20 ते 25 हजार बाईक-टॅक्सी सुरू आहे. आरटीओकडून केवळ 600 ते 700 वाहनांवर कारवाई केली जाते. त्यामुळे आरटीओची कारवाई केवळ दिखावा असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी यावेळी केला आहे.
आरटीओने शुक्रवारी पहिल्यांदा बाइक-टॅक्सीच्या व्यवस्थापकीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असला तरी जोपर्यंत शहरात बाइक-टॅक्सीची ऑनलाइन बुकिंग सेवा बंद होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला.