एखाद्या गाजलेल्या चित्रपटाचे, नाटकाचे किंवा वेब सीरिजचे पुढील भाग येणे ही एक सर्वसाधारण गोष्ट असली, तरी एखादी राजकीय घटना जेव्हा गाजते तेव्हा त्याच प्रकारच्या घटनेचा पुढचा भाग जेव्हा येतो तेव्हा मात्र ती विशेष बाब मानावी लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी पुन्हा एकदा मुंबईतून आसाममधील गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यामुळे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घटना घडली होती त्याचा पुढचा भागच घडला, असे म्हणावे लागेल.
काही महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार आणि इतर दहा आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठले होते. तेथे सर्व प्रक्रिया पार पाडून नंतर भाजपच्या सहकार्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली होती. सत्ता स्थापनेला काही महिने पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्व मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा मुंबईतून गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. या राजकीय घडामोडींचा पहिला भाग जेव्हा घडला होता तेव्हा “मुंबई ते गुवाहाटी’ हा प्रवास थेट झाला नव्हता. मुंबईतून सर्व आमदार प्रथम सुरतला गेले होते. तिथली प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्व आमदार गुवाहाटी येथे आले होते आणि तेथे सत्ता स्थापनेबाबत सर्व विचार झाल्यानंतर सर्वांना गोव्यात आणण्यात आले होते. नंतर गोवामार्गे सर्वजण मुंबईत आले होते. त्यानंतर भाजपच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्यात आली होती. या प्रकियेतील “भाग दोन’चा प्रवास मात्र अतिशय सोपा होता. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री व आमदार थेट मुंबईतून गुवाहाटीला गेले आणि कामाख्या देवीचे दर्शन घेतले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी गेले, अशा प्रकारची चर्चा असली तरी राजकारणामध्ये अशा प्रकारच्या नवस-सायासना कोणत्या प्रकारचे स्थान नसते.
अर्थात, काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी एका ज्योतिषाला आपला हात दाखवण्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह गुवाहाटीला गेले असतील, तर त्यात विशेष काही मानता येणार नाही. अर्थात, पुरोगामी राज्य म्हणून ज्या महाराष्ट्रावर शिक्का आहे त्याच राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचा देवभोळेपणा दाखवला आहे. अनेक मुख्यमंत्र्यांच्या घरांमध्ये संत महंतांचा वावर असतो आणि त्यांचे पाया पडतानाचे फोटोही अनेक वेळा प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उघडपणे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले असेल, तर त्यात वेगळे काही वाटणार नाही. अर्थात, याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयात निकाल अपेक्षित असल्याने एकनाथ शिंदे यांचा हा गुवाहाटी दौराही महत्त्वाचा आहे. कारण सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल त्यानंतर कोणती रणनीती आखायची याबाबतची चर्चा निश्चितच या गुवाहाटी दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर केली असेल. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड योग्य मानून त्यांना अभय दिले तर विषय संपेल. पण जर सर्वोच्च न्यायालयाने विरोधात निर्णय दिला तर पुन्हा एकदा सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणती भूमिका घ्यावी लागेल याचा विचार निश्चितच एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या चर्चेमध्ये केला असेल.
गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पद्धतीने चांगला कारभार करत असले, तरी शिंदे यांच्या बाजूने जे 50 आमदार उभे राहिले आहेत त्यांच्यापैकी काहींमध्ये नाराजीची भावना आहे, असेही बोलले जाते. कारण मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यामध्ये अनेकांना स्थान देण्यात आले नव्हते. अशीच नाराजी काही प्रमाणात भाजपमध्येही आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा अजून एक विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. या विस्तारामध्ये कोणाला स्थान द्यायचे आणि कोणाला इतर अन्य संधी द्यायची याचा विचार निश्चितच या गुवाहाटी दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी केला असेल. अनेक राजकीय पक्ष ठराविक कालावधीनंतर आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी चिंतन शिबिराचे आयोजन करीत असतात. या चिंतन शिबिरांमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांची मानसिकता सकारात्मक बनवण्याचे काम केले जाते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि मंत्र्यांचा गुवाहाटी दौरा हा एक प्रकारे या गटाचे चिंतन शिबिरच मानावे लागेल. या राजकीय चित्रपटाच्या पहिल्या भागाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती तेव्हा एकनाथ शिंदे समोर बसले आहेत आणि आपल्या इतर सर्व सहकाऱ्यांशी बोलत आहेत, असे त्या चित्रांमध्ये दिसत होते. यावेळी अद्याप अशा प्रकारची छायाचित्रे प्रसिद्ध झाली नसली, तरी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधला असेल, हे गृहीतच आहे.
मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून एकनाथ शिंदे सतत काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचीही साथ त्यांना लाभत आहे. पण या दोघांची नावे वगळता इतर कोणताही मंत्री चर्चेत नाही. चर्चेत राहणारे नेतेच काम करत असतात असे संकेत मिळत असल्याने एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना चर्चेत राहण्यासाठीसुद्धा कानमंत्र देतील, अशी शक्यता आहे. अर्थात, अब्दुल सत्तार यांच्यासारखे मंत्री वेगळ्या कारणाने चर्चेत राहिले असले, तरी अशा चर्चा अपेक्षित नाही अशी कानउघाडणीसुद्धा या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी केली असावी. एकीकडे महाराष्ट्रातील राजकारण विविध विषयांवर चर्चेत राहिले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्य राज्यात जाऊन सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. साधारणपणे एखाद्या चित्रपटाचा किंवा मालिकेचा दुसरा भाग नेहमीच पहिल्या भागाच्या तुलनेत कमी आकर्षक किंवा रंजक होता, असे मानले जाते. बहुतेक सर्व प्रेक्षकांना पहिलाच भाग नेहमी आवडतो. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “मुंबई ते गुवाहाटी’ हा दौरा केला होता तेव्हा तो जास्त चर्चेत राहिला होता मात्र याच राजकीय प्रक्रियेचा हा दुसरा भाग तुलनेने चर्चेत राहिला नसला, तरी आगामी राजकारणासाठी हा दौराही महत्त्वाचा ठरणार आहे, हे निश्चित.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडतील त्यावर कोणती भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने हा दौरा घडवला आहे, हे उघड आहे. म्हणूनच मुंबई ते गुवाहाटी “भाग दोन’ अधिक महत्त्वाचा आहे.