पुणे – धानोरी येथे विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यात कष्ट करून पै पै जमवून संसारासाठी जमवलेले सर्व साहित्य पाण्यात बुडाले.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व महापालिकेने तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ऐन करोनाच्या संकटातून नागरिक सावरत असताना पुराच्या तडाख्यामुळे नागरिक पुन्हा हवालदिल झाले आहेत.
मुंजाबावस्ती येथील विघ्नहर्ता कॉलनीतील सुमारे 200 घरांत पाणी शिरले होते. अन्नधान्य, किराणा मालाच्या साहित्यासह बहुसंख्य जीवनावश्यक साहित्य कचऱ्यात फेकण्याची वेळ नागरिकांवर ओढवल्याचे पहायला मिळाले. धनेश्वर शाळेतही पाणी शिरल्याने महत्वाचे रेकॉर्ड भिजल्याचेही आढळून आले.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वैभव कडलक यांनी नागरिकांना मदतीसाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात साफसफाई करण्यात आली. कचरा व राडारोडा उचलण्यात आला. नाल्यातील प्रवाहाला अडथळा ठरणारा कचराही काढण्यात आला.
औषध फवारणीही करण्यात आली. नगरसेवक अनिल टिंगरे, रेखा टिंगरे यांच्यासह जाणता राजा प्रतिष्ठाचे अध्यक्ष शशीअण्णा टिंगरे, मनसेचे गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष टिंगरे, माणिक खेसे आदींनी नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला.
धानोरीत पावसामुळे मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणच्या नागरिकांना पाहिजे ती मदत करण्याला प्राधान्य दिले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सूचनाही दिल्या आहेत. नागरिकांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे.
पुणे महापालिकने विकास आराखड्याप्रमाणे नाल्यांचे नियमाप्रमाणे रुंदीकरण केलेले नाही. त्यामुळेच नागरिकांना पावसाळ्यात दरवर्षी मोठा फटका बसतो. स्टॉर्म वॉटरचा निधी इतर कोणत्याही कामांसाठी वर्ग न करता आहे, त्या कामासाठीच खर्च व्हावा. यासाठी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
– अनिल टिंगरे,
नगरसेवक, भाजप.
धानोरीत विविध ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यात भराव टाकल्याने नाल्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे पावसाच्या पाण्याने नाले तुडुंब भरले व पाणी आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले. नागरिकांसाठी जेवण, पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले. औषध फवारणी ही करून घेण्यात आली. कर्तव्य म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून काम करण्यालाच सतत प्राधान्य देत असतो.
– शशीअण्णा टिंगरे, अध्यक्ष, जाणता राजा प्रतिष्ठान