* लखीमपूर घटनेचा निषेध
* बंद यशस्वी करण्याचा निर्धार
सातारा – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्याच्या प्रकाराचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (दि. 11) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद सातारा जिल्ह्यात यशस्वी करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
केंद्रातील भाजप सरकार व ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तेथे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा आगडोंब उसळला असताना, दुसरीकडे शेतकरीविरोधी कायदे करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. या अन्यायकारक कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.
या आंदोलनात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाच्या जीपखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी राज्य बंदची हाक दिली आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी प्रथमच एकत्र येत हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आघाडीची ताकद साताऱ्यात नक्कीच दिसेल, असा विश्वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला आहे.