पुणे – दरवर्षी शहरात पावसाळ्यात पुणेकरांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो. मात्र, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिका प्रशासन यंदा पाच महिने आधीच सरसावले आहे. शहरात दि. ३० एप्रिलनंतर महापालिकेच्या वेगवेगळया विभाग तसेच खासगी कंपन्यांनाही खोदाईस मनाई करण्यात आली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांंनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यापूर्वी ढाकणे यांनी महापालिकेचा पथ, मलनि:सारण आणि पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन महापालिकेच्या विकासकामांनाही हाच नियम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा पावसाळयात पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ३० एप्रिलपर्यंत कोणत्या विभागाला शहरात किती खोदाई करायची आहे, याचा अहवालही मागविण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळा संपताच रस्ते खोदाईस महापालिकेकडून परवानगी दिली जाते. त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, मलनि:सारण, महावितरण तसेच एमएनजीएल आणि खासगी मोबाइल कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी खोदाई केली जाते. त्यामुळे दरवर्षी शहरात सुमारे ५०० किलोमीटरच्या आसपास खोदाई केली जाते. नंतर रस्ता दुरूस्त केला जातो. मात्र, यंदा ही रस्ता दुरूस्ती दीड महिना केला जाणार आहे. साधारणनणे दि. १ मेनंतर रस्ते दुरूस्ती सुरू होणार आहे. ती १५ जूनपर्यंत केली जाणार आहे.
महावितरणसह खासगी कंपन्यांनाही नोटीस
महापालिकेच्या विभागांसोबतच महावितरण, एमएनजीएल तसेच खासगी केबल कंपन्यांनाही ३० एप्रिलनंतर खोदाई करण्यास मनाई असल्याची नोटीस दिली जाणार आहे. अनेकदा या कालावधीच्या आधीची मान्यता घेऊन या कंपन्यांकडून पालिकेने रस्ते दुरूस्ती सुरू केल्यानंतर खोदाई केली जाते. त्यामुळे या कंपन्यांनाही याबाबत सूचना केल्या जाणार आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.