पुणे -पीएमपी चालक बऱ्याचदा बेशिस्तपणे बस चालवतात. यामुळे अपघात होण्यासह अन्य प्रसंगही उद्भवतात. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाला पत्र लिहून अपघात टाळण्यासाठी आणि बेशिस्तपणे वाहन न चालविण्यासाठी चालकांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.
शहरात दि. 22 ऑक्टोबर रोजी सेनापती बापट रस्त्यावर पीएमपी बस चालकाने रिव्हर्स बस चालवून तीन कारला धडक दिली होती. तसेच दररोज कोठे ना कोठे बेशिस्तीमुळे नागरिकांचे चालकांशी वाद होतात. या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठविण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) विजय मगर म्हणाले, “पोलिसांनी केलेल्या पाहणीत पीएमपी चालक बेशिस्तपणे बस चालवत प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. दि. 22 ऑक्टोबरची घटना हे त्याचे उदाहरण आहे. त्या दिवशी चालकाचा बेशिस्तपणा कुणाच्या तरी जीवावर उठू शकला असता.’
दरम्यान, रस्त्यावर बस चालवताना वाहनचालक शांत राहतील, यासाठी कार्यशाळा घ्याव्यात. मागील महिन्यात 323 बस चालकांना वाहने कोठेही पार्क केल्यामुळे आणि वाहतूक कोंडी निर्माण केल्याबद्दल दंड ठोठावला आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी केलेले निरीक्षण
काही बसचालक ऍक्सिलरेटरवर पाय ठेवून लाल सिग्नलवर इंजिनचा मोठा आवाज करतात. ज्यामुळे बससमोरील वाहनचालकांना सिग्नल तोडण्यास भाग पाडले जाते. अशा स्थितीत कोणीतरी लाल दिवा तोडला आणि अपघात झाला तर काय होईल?
पीएमपी बसचालक नियमितपणे लाल सिग्नल तोडतात. लेनची शिस्त पाळत नाहीत आणि घाईघाईने बस चालवतात. पीएमपी बसने वाहतुकीचे नियम मोडू नयेत, यासाठी चौकातील पोलीस हवालदार प्रयत्न करत आहेत.