पुणे, दि. 23 -महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठीही सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यात या गावांचे सांडपाणी संकलित करून सुमारे 250 एमएलडी क्षमतेचे सात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीकडून याबाबतचा प्राथमिक आराखडा महापालिकेस सादर केला असून, त्याचा अहवाल नुकताच महापालिकेस सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या कामासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने महापालिकेकडून या गावांसाठी मुळा-मुठा नदी सुधार योजनेप्रमाणे अनुदान देण्यासाठी जपानमधील जायका कंपनीला साक़डे घालण्यात आले असून, त्याबाबत पत्रही पाठविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.
महापालिकेकडून शहरात निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. हा सुमारे 1500 कोटींचा प्रकल्प असून त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या प्रकल्पाची मान्यता सुरू असताना 2017 मध्ये 11 गावे पालिकेत समाविष्ट झाली. त्या गावांसाठीही महापालिकेने सांडपाणी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असून, हे सुमारे 350 कोटींचे काम सुरू आहे. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा शासनाने 23 गावांचा समावेश पालिकेत आले. त्यामुळे या गावांच्या सांडपाण्यावरही प्रक्रिया करून ते नदीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेने या गावांचाही आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. या आराखड्यानुसार 1100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेस तो करणे शक्य नसल्याने पालिकेने जायका कंपनीस याबाबत पत्र पाठविले आहे.
पावसाळी वाहिन्यांसाठी 300 कोटींचा खर्च
या गावांमध्ये यावर्षी पावसाच्या पाण्याने पूरस्थिती उद्बवली होती. त्यामुळे महापालिकेकडून सांडपाणी वाहिन्यांसोबतच पावसाळी जलवाहिन्याही टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी आराखडा करण्याचे काम सुरू असून, या कामासाठीही 300 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.