पुणे, दि. 23 -पुणे शहर देशाची वैचारिक राजधानी आहे. पुण्यात जो विचार आज होतो, तो उद्या संपूर्ण देशात केला जातो. पुणे शहर उत्तम शहर आहे. शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे. पेशवाई इथेच होती. सामाजिक, राजकीय संघर्ष येथूनच पाहिला. ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांचा प्रभाव येथेच होता. पुणे करार येथे झाला. असा शहराला वारसा लागला आहे. विद्येचे माहेरघर तर आहेच. ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज येथूनच असल्याचे गौरवोद्गार माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी काढले.
पुणे जिल्हा न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या पायाभरणीची शताब्दी आणि पुणे बार असोसिएशनच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. सी. चांडक, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, उदय लळीत यांच्या पत्नी अमिता, बारचे उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. सुरेखा भोसले, ऍड. अमोल शितोळे, हिशोब तपासणीस ऍड. शिल्पा कदम यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि वकील उपस्थित होते.
“”वकील हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणाऱ्या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात, त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे. राज्यघटनेत विधी सेवा या केवळ एकाच व्यवसायाचा उल्लेख आहे. ही वकिलांसाठी अभिमानास्पद बाब आहे,” असेही लळीत यांनी आवर्जून नमूद केले.
“न्यायसंस्थेचा भाग असलेल्या प्रत्येक घटकाने चांगली कामगिरी करून समाजात महत्त्वाचे योगदान देत राहावे,” असे आवाहन न्या. चांडक यांनी केले.
“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेल्या पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत उपस्थित राहिल्याचा अभिमान वाटतो,” अशी भावना अमिता लळीत यांनी व्यक्त केली. ऍड. पांडुरंग थोरवे यांनी प्रास्ताविक करताना न्यायव्यवस्थेचा इतिहास सांगितला.
डॉ. आंबेडकर यांचे पहिले भाषण
राज्यघटना अमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले भाषण पुणे जिल्हा न्यायालयाच्या अशोका सभागृहात झाले होते. त्यावेळी त्यांनी लोकशाहीच्या उत्कर्षासाठी चार तत्वे सांगितली होती. या तत्त्वांची जपणूक करण्याचे कर्तव्य वकिलांचे आहे. लोकशाहीचा उत्कर्ष होण्यासाठी समाज हा कधीही विषमतेने दुभंगलेला नसावा, विरोधी पक्षाचे सकारात्मक व परिणामकारक अस्तित्व असावे, कायदा व प्रशासनाच्या सर्व कामांमध्ये समानता असावी आणि घटनात्मक नितीमत्तांचे पालन होणे गरजेचे आहे, अशी चार तत्वे असल्याचे लळीत यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात शिकता आले नसल्याची खंत
पुणे हे माझे आजोळ आहे. ते सदाशिव पेठेतील आहे. माझ्या आई-वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले. त्यामुळे डायनिंग टेबलवर जेवताना पुण्याबद्दलच्या आठवणी निघायच्या. दुर्दैवाने मला पुण्यात शिकता आले नाही, अशी खंत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. एका फौजदारी खटल्यात पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा न्यायालयात आलो होतो, तसेच जनरल अरुणकुमार वैद्य हत्या खटल्यात सीबीआयचा वकील या नात्याने घटनास्थळ पाहण्यासाठी पुण्यात आलो होतो, असेही त्यांनी सांगितले.