पुणे, दि. 23 – कैवल्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण आर.एम. डी. फाउंडेशनद्वारे करण्यात आले. त्याचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, उपाध्यक्षा शोभा आर. धारिवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, “माऊलींवर बालपणीपासून असलेली श्रद्धा या कार्याच्या निमित्ताने व्यक्त करता येत आहे,’ अशी भावना आरएमडी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनी व्यक्त केली.
हजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ-मृदंगांच्या गजरात हा सोहळा पार पडला. या प्रसंगी पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन उपस्थित होते. संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील कीर्तन सभागृह, तेथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे देखावे यात प्रामुख्याने वडील विठ्ठलपंत व आई रुख्मिणीमाता यांसह भावंडे, रेड्यामुखी वेद वदविल्याचा प्रसंग, चारही भावंडं आपेगांवहून पैठणला जातांनाचे क्षण, ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे मुक्ताईंचे अभंग, भिंत चालविली, ज्ञानेश्वरी लिखाण आणि संजीवन समाधी इत्यादी बाबतचा देखावा, मंदिरातील खांबांचे नक्षीकाम व रंगरंगोटी ईत्यादी कामासाठी आर.एम.डी फाउंडेशनद्वारा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
“कामानिमित्त देशभर फिरत असताना माझे वडील रसिकलालजी धारिवाल यांनी दिलेल्या देणग्या व त्यातून उभी राहिलेली कार्य अनपेक्षितपणे पाहायला मिळतात. आपेगांव येथील कमानदेखील रसिकलाल धारिवाल यांनी बांधून दिली होती,’ अशी माहिती जान्हवी धारिवाल-बालन यांनी दिली. तसेच माऊलींच्या मूर्तीला अर्पण होणारे हार, फुलांच्या माळा, प्रसादाची पाकिटे, निर्माल्य हे परिसरात न टाकता, त्याचा योग्य उपयोग करावा. त्यामुळे आपला परिसर स्वस्च्छ राहील, असे आवाहनही जान्हवी धारिवाल यांनी यावेळी केले.
तर, “मी माझ्या कामात व्यस्त असलो, तरी मला माऊलींनी येथे उपस्थित राहण्याचा संदेश मला दिला. त्यामुळे या प्रसंगास उपस्थित राहता आले,’ अशी भावना पुनीत बालन यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच, मंदिराचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते.