पुणे – महापालिकेकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटूंबांना शहरी गरीब योजनेअंतर्गत गंभीर आजाराच्या रूग्णासाठी वर्षाला दोन लाखांंच्या उपचाराचा खर्च दिला जातो. मात्र, प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत उपचार घेणार्या सदस्यांना या योजनेचे सभासदत्वाच्या कार्डचे नूतनीकरण केल्यानंतरच उपचाराचा खर्च दिला जातो.
मात्र, अशा रूग्णांच्या सभासदत्वांचे महापालिकाच नूतनीकरण करणार असून त्यांचे उपचार कायम राहतील, यासाठी त्यांना कागदपत्रे पुढील काही महिन्यात सादर करण्याची मुदत दिली जाणार आहे. कर्करोग, डायलेसिस तसेच हुदय रोगांवर उपचार घेणार्या रूग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
असा होणार फायदा
महापालिकेकडून शहरातील १ लाख ६० रूपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या कुटूंबातील नागरिकांंना शहरी गरीब योजने अंतर्गत १ लाखांपर्यंत तसेच काही गंभीर आजारांसाठी दोन लाखांपर्यंतचा उपचाराचा खर्च दिला जातो. त्यासाठी देण्यात येणार्या कार्डची मुदत १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी असते. त्यानंतर उपचार घेणार्या सभासदांना आपल्या कार्डचे नूतनीकरण करावे लागते. मात्र, त्यासाठीचा उत्पन्नाचा दाखला तसेच आवश्यक कागदपत्रे वेळत न मिळाल्यास खासगी रूग्णालयात सभासद नोंदणी नुतनीकरण नसल्याने महापालिकेकडून उपचाराचे पत्र दिले जात नाही.
परिणामी, नागरिकांना रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी पदरमोड करून उपचार घ्यावे लागतात अथवा रूग्ण उपचार अर्धवटच सोडत असल्याने रूग्णांच्या जीवावर बेतते. ही बाब लक्षात घेता महापालिकेने गंभीर आजाराच्या रूग्णांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे उपचार थांबू नयेत यासाठी त्यांच्या सभासद कार्डचे नूतनीकरण महापालिकेच्या संगणप्रणालीवर आपोआप होणार आहे.
पाचशे पेक्षा अधिक रूग्णांना फायदा
महापालिकेच्या या निर्णयाचा फायदा शहरातील दीड हजारहून अधिक गंभीर आजाराच्या रूग्णांना होणार आहे. कर्करोग झालेल्या रूग्णांना केमे थेरेपी तसेच किडनीच्या आजारामुळे डायलेसिस घेणार्या रूग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. य़ा रुग्णांची संख्या सुमारे पाचशेपेक्षा अधिक आहे. अनेकदा नूतनीकरणाच्या काळात यातील अनेक रूग्ण उपचार थांबवितात त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.