नगर – मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही. तसेच मंत्री छगन भुजबळांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे भाष्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केले. ओबीसी समाज व मराठा समाज हे एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो, असे आमचे प्रेम आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्या मुले दोन समाजात तेढ झाल्याचे दिसते असे ते म्हणाले. असे असले तरी गावोगावी, खेडोपाड्यात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे हे सोमवारी (दि.२२) नगर येथील बाराबाभळी येथून ते मुंबईकडे निघाले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘थोडासा धीर धरा’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले की, आता धीर किती धरायचा तेच कळेना. त्यांनी एकदा समोर येऊन बोलावं, त्यांना सात महिन्याचा वेळ दिला काही झाले नाही, सात महिन्यात ते कधी भेटायलाही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी येऊन एकदा भेटावं व दूध का दूध व पाणी का पाणी करावं, असे जरांगे म्हणाले.
मुस्लिम व धनगर समाजासाठी लढा देणार
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की त्यांच्यासाठीही लढा देणार आहे. तसेच धनगर बांधवांसाठीही लढा देणार आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात ते मुस्लिम बांधवांसाठी व धनगर समाजसाठी लढा देतील असे दिसते.
आता मराठ्यांचा वनवास मिटवा : केदार
मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेत वनवासाचे वस्त्र घालून आंदोलक सहभागी झाले होते. आज श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुणांनी पोत्यांचे वस्त्र घालून वाटचाल सुरू केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. “अयोध्येत राम मंदिर तयार झाले रामाचा वनवास मिटला. आता मराठ्यांना आरक्षण देऊन आमचाही वनवास मिटवा. अन्यथा या सत्ताधाऱ्यांना वनवासात पाठवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा वनवास यात्रेचे प्रमुख आयोजक योगेश केदार यांनी केले.