Supriya Sule on Pune accident । पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसादसर्व स्तरातून उमटले. त्यानंतर या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली. मात्र त्याला अटक केली असताना त्याला पिझ्झा बर्गर कुणी दिला? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
माझ्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस द्यावं Supriya Sule on Pune accident ।
“दोन निष्पाप जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांच्या पालकांची अवस्था पाहिलीत का? याची जबाबदारी कोण घेणार? रस्ते सुरक्षेबाबत सरकार काही बोलणार की नाही? माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे. ज्याने केला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत असं म्हणाले की, पोलिसांनी राजकीय दबावाखाली दबलं जाऊ नये. राजकीय दबाव कुणी टाकला? याचं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारनेच मान्य केलं आहे. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे.” असे आव्हानच त्यांनी दिले.
“त्या मुलाला पिझ्झा बर्गर कुणी दिला?” Supriya Sule on Pune accident ।
“अल्पवयीन मुलाला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याला पिझ्झा-बर्गर कुणी दिला? तसंच माझा हा प्रश्नही आहे की १७ वर्षांच्या मुलाला दारु कशी काय दिली? गाडीची चावी देताच कशी काय? एक युवक आणि युवती या दोघांचा मृत्यू झाला आहे. ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचा मी निषेध करते. कुणी फोन केल्यावर त्या मुलाला जामीन मिळाला याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात सरकारचा हलगर्जीपणा सपशेलपणे दिसून येतो आहे. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून उत्तर दिलं पाहिजे.” असे सुळे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, पुणे अपघात प्रकरणात दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली. तसंच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आलीय. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.