त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनंतर आता इच्छुक उमेदवारांसमोर आरक्षणाची धाकधूक
जयंत जाधव
सिंहगडरस्ता – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आजी-माजींसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. बदललेली प्रभाग रचना आणि त्यानंतर आरक्षण हे मुद्दे निवडणुकीपूर्वीच इच्छुक उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. कारण, यावरच निवडणुकीचे तिकीट मिळणार की पत्ताच कट होणार, हे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन ते चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेल्यांनी मात्र तिकीट मिळाले तर ठीक अन्यथा “अपक्ष’ म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे.
महापलिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्वच गणित बदलली आहेत. काम केले एका भागात आणि उमेदवारी मिळणार दुसऱ्या भागात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तिकीट मिळवताना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धींना कसे रोखायचे हा प्रश्न आहे. शिवाय, आरक्षण कसे पडेल? महिला आरक्षण पडले तर घरातील कोणत्या महिला सदस्यांसाठी उमेदवारी मागायची? याबाबतही सर्वांनीच तयारी केली आहे.
महापालिका निवडणूक सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे, त्यात अन्य पक्षही आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. अशी स्थिती असली तरी महापालिका निवडणूक राजकीय पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे, असा प्रश्न असून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागाही कमी होणार आहेत. याच कारणातून बहुतांशी प्रभागातील उमेदवार “कुंपणा’वर उभे आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांचे बॅनर लागले असले तरी त्यावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही, त्यामुळे ज्या पक्षाची उमेदवारी त्याची चाकरी, असे धोरण अनेकांनी ठेवले आहे.
प्रत्येक पक्षाचे महत्वाचे नेते, शहराध्यक्ष हे इच्छुक उमेदवारांना तुम्ही तयारीला लागा, असे सांगत असल्याने इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. यासाठी अहवाल तयार करून तो पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना दाखवणे, नेत्यांची भेट घेणे. त्या-त्या प्रभागासाठी उमेदवार म्हणून मीच योग्य कसा, यासाठी अंतर्गत सेटींग लावणे, असे सर्व “कार्यक्रम’ सध्या सुरू आहेत.