पिंपरी – दररोज सुमारे 42 एमएलडी घरगुती सांडपाणी पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रात मिसळत आहे. कोणतीही प्रक्रिया न करता मिसळणाऱ्या या सांडपाण्यामुळे या नद्यांच्या प्रदुषणात भरच पडत आहे. हे सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिकेकडून पवना आणि इंद्रायणी नदीच्या कडेने इंटरसेप्टर लाइन टाकली जात आहे. त्याशिवाय, 3 मैलाशुद्धीकरण केंद्रांची उभारणी केली जात आहे. पुढील दोन ते तीन वर्षात या नद्यांमध्ये थेट मिसळणारे सांडपाणी थांबेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेकडून दररोज 490 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर, एमआयडीसीमार्फत दररोज 30 दशलक्ष लिटर इतके पाणी दिले जात आहे. त्यातील 25 टक्के म्हणजे 130 एमएलडी पाण्याची गळती होते. म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या 390 दशलक्ष लिटर पाण्यापैकी निर्माण होणारे घरगुती सांडपाणी हे किमान 80 टक्के इतके आहे.
या प्रमाणानुसार दररोज सुमारे 312 दशलक्ष लिटर इतके सांडपाणी निर्माण होते. महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात एकूण 14 मैलाशुद्धीकरण केंद्र उभारलेले आहेत. 353 दशलक्ष लिटर इतक्या सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करण्याची या केंद्रांची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात सध्या 270 दशलक्ष लिटर इतक्या सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे एकूण 312 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी 42 दशलक्ष लिटर इतके सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत आहे.
इंटरसेप्टर लाइन आणि एसटीपी प्लांटची उभारणी
प्लास्टिक, कचरा बाहेर काढून सांडपाणी नजीकच्या मैलाशुद्धीकरण केंद्राकडे (एसटीपी प्लांट) नेण्यासाठी पवना आणि इंद्रायणी नदीच्या कडेने इंटरसेप्टर सिव्हेर लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. सध्या पवना नदीच्या दोन्ही कडेला सुमारे 32 किलोमीटर अंतरात तर, महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीच्या कडेला 11 किलोमीटर अंतरात इंटरसेप्टर सिव्हेर लाइन टाकण्यात येत आहे. अमृत योजनेतंर्गत पिंपळेनिलख (15 एमएलडी), बोपखेल (5 एमएलडी) आणि चिखली (12 एमएलडी) येथे मैलाशुद्धीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. ताथवडे येथे देखील 10 एमएलडी क्षमतेच्या मैलाशुद्धीकरण केंद्राचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक जागेचा ताबा महापालिकेला
मिळालेला नाही.
बोपखेल, पिंपळे निलख आणि चिखली येथे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. नाले, पावसाळी पाण्याच्या नलिका, सांडपाणी नलिका आदींचे सर्वेक्षण करून जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. जिथे सांडपाणी नलिका नाहीत, तिथे त्यांचे जाळे उभारले जाईल. नद्यांमध्ये थेट मिसळणारे 100 टक्के सांडपाणी थांबविण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल.
– रामदास तांबे, सह-शहर अभियंता, पर्यावरण
शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 100 टक्के घरगुती सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी नदीच्या कडेने इंटरसेप्टर सिव्हेर लाइन टाकणे, आवश्यकतेनुसार मैलाशुद्धीकरण केंद्रांची उभारणी आदी कार्यवाही केली जात आहे.
– संजय कुलकर्णी, सह-शहर अभियंता, पर्यावरण.