वाशीच्या बाजारात रत्नागिरीतून पहिली आवक
चार डझनाच्या पेटीला 20 हजारांचा भाव अपेक्षित
पुणे – साधारणपणे फेब्रुवारी-मार्चदरम्यान दाखल होणारा हापूस आंबा यंदा चक्क ऑक्टोबरमध्येच रत्नागिरीतून निर्यात झाला आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तो दाखल झाला. या पहिल्या पेटीला साधारणपणे 20 हजार रुपयांचा भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश शितप यांच्या भाटये बागेतून हापूसची पहिली पेटी दि. 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी वाशीकडे रवाना झाली. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात जूनमध्ये पाऊस झालाच नाही. या कालावधीत उन्हाचा कडाका होता.
दरम्यान, शितप यांच्या आंबा बागेतील एका झाडाला ऑगस्टमध्ये मोहोर फुलला होता. याच काळात पाऊसही नव्हता. त्यामुळे मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी शितप यांनी औषध फवारणी केली.
गेली दोन महिने निगा राखल्यानंतर फळ मोठे होताच, मंगळवारी काढणी करताच चार डझन आंब्यांची पेटी त्यांनी वाशी बाजारात पाठवली. ऑक्टोबर महिन्यांत हापूसची पेटी जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.
बागायतदारांचे निरीक्षण…
हापूसचा हंगाम मार्च ते जून काळातच असतो. फेब्रुवारीच्या अखेरीस आंबा बाजारात दाखल होतो. अनियमित पावसामुळे झाडांना अवेळी मोहोर येण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही हापूस आंबा दाखल झाला आहे.