नीरा -पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेकडे नीरा ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे. बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) नियोजित असलेल्या या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला अवघ्या 40 लोकांनी हजेरी लावल्याने ही ग्रामसभा तहकूब करावी लागली.
आपल्या गावाची विकासाची दिशा ठरवायची असेल तर त्याबाबत निर्णय हे ग्रामसभेत घेतले जातात. अनेक लोक ही ग्रामसभा केव्हा होणार याकडे डोळा लावून बसलेले असतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामसभा ही राजकीय नेत्यांच्या कुस्त्यांचा आखाडा बनली आहे. अनेक राजकीय पुढारी या ग्रामसभेच्या निमित्ताने एकमेकांवर चिखल फेक करत असतात. एकमेकाची जुनी काढत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी विकासावर चर्चा होण्यापेक्षा कोण किती भांडला आणि कोण किती तोऱ्यात होता? याबाबतची चर्चा जास्त रंग असते.
त्यामुळे आता अशा ग्रामसभांकडे ग्रामस्थ लोक फिरके नासे झाले आहेत. अजेंड्या वरील विधायावपेक्षा लोक स्वतःला अपेक्षित विषय घेऊन वाद घालतात आणि अजेड्यावरील विषय बाजूला राहतात.त्यामुळे ग्रामसभेत अनेक वेळा वाद होतात. ग्रामसभेला किमान 100 लोक उपस्थित राहणे आवश्यक असते; मात्र तेवढी गणसंख्या सुद्धा या ग्रामपंचायतीला गाठता आली नाही. आता याला राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा म्हणायचा? की ग्रामस्थांची बेफिकिरी?
मात्र अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार होणार असेल तर गावचा आणि देशाचा विकास कसा होणार? गाव आणि देश नक्की कोणत्या दिशेने जाणार? याबाबतची शंका निर्माण होते आहे. आजच्या या ग्रामसभेला आलेल्या काही लोकांनी ग्रामसभा न झाल्याने अकांड तांडव केले. पण या ग्रामसभेला अपेक्षित गणसंख्या आणणे हे सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य आहे किंवा या ग्रामसभेला येणे हे सर्वच ग्रामस्थांचं कर्तव्य आहे;
मात्र केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ग्रामसभा उधळून लावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे ग्रामस्थ ही आता अशा ग्रामसभांकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक वेळ आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.