नीरा – पुरंदर तालुक्यातील पूर्व तर बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गावांच्या मध्यातून जाणाऱ्या सातारा-नगर मार्गावरून मार्गावर फक्त एकच एसटी बस धावत आहे. ती बसही शिरूर आगाराची असूनी ती शिरूर-लोणंद ही आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पुरंदर आणि बारामती तालुक्यातील या गावांना या मार्गावरून एसटी बसच नाही.त्यामुळे या गावातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय; मात्र गावांच्या दळणवळणाच्या साधनांचा विचार येथील राज्यकर्ते करताना दिसत नाहीत.
सातारा जिल्हा हद्द सोडल्यानंतर पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातून पुढे सांसद आदर्श गाव गुळुंचे, बारामती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम मुर्टी, मोढवे, उंबरओढा, अष्टविनायकांपैकी मानाचे पहिल्या मयुरेश्वराचे मोरगाव पुढे सुपा, पाटस, केडगाव चौफुला, दौंड तालुक्यातील सांसद आदर्श गाव दापोडी, नाव्हरे मार्गे शिरूर आदी ठिकाणी जाणाऱ्या एस.टी प्रवाशांचे हाल होत आहेत. शेतमाल बाजारात घेऊन जाणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, विविध छोट्या गावात शिक्षणासाठी जाणाऱ्या शिक्षकांना या मार्गावर एकही एसटी बस नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरातून शेतकरी दररोज शेतमाल नीरा किंवा लोणंद बाजारत विक्रीसाठी आणतात. दर गुरुवारी लोणंद तर बुधवारी नीरा येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. या लोकांना एसटी बस उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. या मार्गावरून सतत लांब पल्ल्याच्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
परराज्यातील ट्रकचालक जेवणाचा खर्च निघावा म्हणून थोडक्या पैशात प्रवासी वाहतूक करतात; मात्र ही वाहतूक धोकादायक आहे. नीरा ते केडगाव चौफुला या मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालय असल्याने या विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. दररोज सकाळ संध्याकाळ शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत हे विद्यार्थी व शिक्षक चारचाकी व दुचाकीस्वारांना तसेच अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक, टॅंकरला हात दाखवून जिव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात.
तीही नियमित नाही…
बारामती व शिरूर आगाराच्या नीरेतून सकाळी सात वाजता नीरा-पाटस, आठ वाजता नीरा-मोरगाव, सव्वानऊ वाजता सातारा-शिरूर, सव्वाअकरा वाजता लोणंद-शिरूर, एक वाजता नीरा-सुपे, दोन वाजता नीरा- मोरगाव, चार वाजता नीरा-मोरगाव, साडेपाच वाजता नीरा-वढाणे, सात वाजता लोणंद-शिरूर आणि रात्री आठ वाजता भोर आगाराची भोर-मुर्टीनंतर ती बस मोरगाव मुक्कामी पूर्वी होती. या पैकी सध्या फक्त एकच बस सव्वाअकरा वाजताची लोणंद-शिरूर ही बस उपलब्ध आहे. तीही नियमितपणे नसते, त्यामुळे या भागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.