इंदापूर – इंदापूरच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालातून भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. केंद्रात व राज्यात आपली सत्ता असल्याने आगामी काळात विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना निधी कमी पडू देणार जाणार नाही. नूतन सरपंच व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनमध्ये करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष ऍड. शरद जामदार, पृथ्वीराज जाचक, ऍड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, मारुती वणवे, डॉ. लक्ष्मण आसबे, नूतन सरपंच मयूरी जामदार आदीं उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभावीपणे करावे,असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी तर इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी आभार मानले.