पेठ -राष्ट्रीयकृत आणि जिल्हा सहकारी बॅंक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांना कर्ज पुरवठा करतात. या कर्जावर राज्य सरकार तीन आणि केंद्र सरकार तीन टक्के असे मिळून सहा टक्के व्याज सवलत देतात. जिल्हा बॅंक कर्जदार शेतकऱ्यांकडून निव्वळ मुद्दल रक्कम स्वीकारत असे आणि त्यावरील व्याज सवलत रक्कम शासन बॅंकेत जमा करत असे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सरकारने व्याज सवलतीची रक्कम बॅंकेत देणे बंद केले आहे.
बॅंकांनी शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करून घेतले आहे; परंतु त्यांना अद्याप व्याज सवलत रक्कम पुनर्प्राप्त झालेली नाही. सतत दोन वर्ष मुद्दलीवर व्याज भरावा लागत असल्यामुळे आणि भरलेले व्याज प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे तीन लाखापर्यंतचे पीक शून्य टक्के व्याजदराची घोषणा हवेतच विरली का, अशी विचारणा शेतकरी करत आहे.
येत्या मार्च अगोदर शेतकऱ्यांनी मुद्दलीवर व्याज भरलेली आहे ती व्याज रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली तर शेतकऱ्यांना येत्या मार्चमध्ये मुद्दल रक्कम भरता येईल. अन्यथा शेतकरी थकबाकीत जाण्याची शक्यता आहे, असे कारेगावचे शेतकरी पांडुरंग नाईकरे यांनी सांगितले.
मुद्दलीवर भरलेल्या व्याजाचा परतावा देण्याचे जाहीर करूनसुद्धा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना व्याज परतावा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे.
– संजय कराळे, अध्यक्ष, कारेगाव विविध कार्यकारी सोसायटी
जिल्हा बॅंकेने राष्ट्रीयकृत बॅंकेप्रमाणे व्याज सवलत पैसे पैसे जमा केले पाहिजेत. गेली दोन वर्षे मुद्दलीवर व्याज रक्कम भरावा लागत असल्यामुळे सातगाव पठार भागातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.
– राम तोडकर, सरपंच, पेठ
नियमित कर्जपुरवठा भरणारा शेतकरी व्याज परताव्याची रक्कम जमा होणार या आशेवर आहे. येत्या मार्चपर्यंत आत्तापर्यंत सवलत व्याज भरलीे रक्कम त्वरित जमा करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– दिलीप पवळे,माजी अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी, पेठ