– रमेश जाधव
रांजणी- चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे विभागातील साखर कारखान्याचा हंगाम जवळपास मध्यावर आला आहे. सहकारी आणि खासगी अशा एकूण 30 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत या विभागात सुमारे 1 कोटी 6 लाख 226 टन उसाचे गाळप करण्यात आले असून, त्यातून 99 लाख 28 हजार 328 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर साखरेचा उतारा सरासरी 9.37 टक्के एवढा आहे.
यंदा पावसामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या होत्या; परंतु त्यानंतर हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले. मुळातच चालू वर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. पुणे विभागात सातारा, पुणे जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे.
यंदा गाळपसाठी सुमारे 2 लाख 74 हजार 196 हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. शासनाने 15 ऑक्टोबर 22 पासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याचा आदेश दिले होते. सध्या सुरू असलेल्या साखर कारखान्यांमध्ये सहकारी 17 आणि खासगी 13 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू ठेवले आहे.
गाळपात “बारामती ऍग्रो’ आघाडीवर
पुणे विभागातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 73 हजार 50 टन एवढी आहे. आत्तापर्यंत झालेल्या गाळपमध्ये बारामती ऍग्रो कारखान्याने सर्वाधिक आघाडी घेतली आहे, तर कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याने देखील गाळपामध्ये लक्षणीय आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.
खासगी कारखान्यांचा उतारा 8.90 टक्के
पुणे विभागात सहकारी साखर कारखान्यांनी 54 लाख 62 हजार 138 टन ऊसाचे गाळप केले. त्यातून 53 लाख 57 हजार 660 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी साखर उतारा 9.81 टक्के एवढा होता. खासगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत 51 लाख 38 हजार 88 गाळप केले, त्यातून 54 लाख 70 हजार 668 क्विंटल साखरेचे उत्पादन केले साखर उतारा सरासरी 8.90 टक्के एवढा राहिला आहे.