कापूरहोळ, -प्रशासनाने स्थानिकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे लेखी आश्वासन देऊनही खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या टोलवसुलीबाबत भोर-वेल्हा तालुक्यातील नागरिकांमधे संतप्त भावना असून, टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जाणीवपूर्वक बाजूला ठेवून टोलवसुली होत असून, स्थानिकांना अरेरावीही केली जात आहे. यामुळे हा वादग्रस्त टोलनाका कायमचा हटवावा, अशी भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली असून, याबाबत 1 एप्रिलला सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर (ता. हवेली) येथील वादग्रस्त टोलनाका हटावसाठी सर्वपक्षीय स्थापित असलेल्या शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची बैठक केळवडे (ता. भोर) येथे गुरुवारी (दि. 16) दुपारी पार पडली. यावेळी कृती समितीने 2 एप्रिलला जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवापूर टोलनाका स्थलांतरीत करण्याची मागणी जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून होत असूनही येथे टोल प्रशासन मुजोरी करीत आहेत.
यापूर्वी केलेल्या आंदोलनामधे टोल प्रशासनाने दिलेला शब्द फिरवला आहे. टोलनाक्याचा अंतिम लढा 2 एप्रिलला टोलनाक्यावर दिला जाणार असून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावागावानत जाऊन जनआंदोलन जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन कृतीसमितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी केले आहे.
यावेळी प्रत्येक पक्षाच्या तालुकानिहाय आंदोलकांच्या समितीची स्थापना करण्यात आली. सर्वपक्षीय मेळावे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधे घेण्यात येणार असून कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, किसान मोर्चा या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्या विरूद्ध एल्गार केला. टोलनाक्यावर आरेरावी करणाऱ्या नाना कोंडे या व्यक्ती विरूद्ध कृती समितीच्या सदस्यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
या बैठकीला कॉंग्रेसचे शैलेश सोनवणे, भाजपचे बाळासाहेब गरुड, माजी सभापती लहुनाना शेलार, जीवन कोंडे, शिवसेनेचे माऊली शिंदे, आदित्य बोरगे, विठ्ठल आवाळे, दीपक दामगुडे, भरत किन्हाळे, रामभाऊ मांढरेख, गोरख मानकर, शुभम यादव, अरविंद सोंडकर, दादा पवार, दादा आंबवले यांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.