राहु -राहू व बेट परिसरात डास व माशांनी अक्षरशः थैमान घातल्याचे दिसून येत आहेत. थंडीचा प्रभाव कमी होत गेला तशी डासांची संख्या वाढू लागली आहे. त्यात भर म्हणून गेले दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन उष्ण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देखील डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या डासांचा त्रास हा माणसांबरोबर मुक्या पाळीव प्राण्यांना देखील होत आहे. त्यातही दुभत्या जनावरांना याचा मोठ्या प्रंमाणात त्रास होऊन दूध उत्पादनात घट होत आहे. डास चावल्यामुळे जनावरे आजारी पडून तो देखील खर्च पशुपालांकांना होत आहे.
या डासांमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. थंडी, ताप, घसा याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वर नियंत्रण करण्यासाठी धुरळणी-फवारणी करणे आवश्यक आहे; परंतु त्या दृष्टीने कोणतीही पावले पडताना दिसत नाही. तालुक्यापासून ते गाव, वाड्या-वस्त्यांपर्यंत या संदरबात नियोजन करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत मार्फत धुरळणी करणे आवश्यक आहे; परंतु ग्रामसेवक हे संपात सहभागी असल्यामुळे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे नियोजन कोणी करायचे, असा प्रश्न आहे.
दूध उत्पादकांना दुहेरी फटका
डासांमुळे दुभत्या जनावरांना फटका बसून दूध उत्पादन तर कमी होतच आहे; परंतु जनावर आजारी पडून औषधांचा खर्च वेगळाच होत आहे. राहू पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या डॉक्टरांची बदली झाल्यामुळे राहूचा अतिरिक्त चार्ज हा वडगाव बांडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे आहे. दोन्ही कार्यक्षेत्र हे मोठी असल्यामुळे सेवा देताना काही प्रमाणात का होईना अडचणी येत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
जलपर्णीचा जास्त परिणाम
बेट परिसरात मुळा-मुठा नदीला पुण्याचे सांडपाणी वाहून येत असते. त्या पाण्यावर जलपर्णीची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामुळे डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच नदीपासून कमीत-कमी एक ते दोन किलोमीटरवर या डासांचा त्रास होत आहे.
अतिरिक्त चार्ज असल्यामुळे थोडी अडचण येत आहे; परंतु सेवा देण्याचा प्रयत्न चालूच आहे. ग्रामपंचायतला फवारणीसाठी काही प्रमाणात औषध उपलब्ध करून दिली जातील. आवश्यक ती उपाय योजना केली जाईल.
-एच. डी. शितोळे, पशुवैद्यकीय अधिकारी राहू/वडगाव बांडे
एच3एन2 सदृश्य रुग्ण दिसून येत आहेत. डेंगू सदृश्य रुग्णाचे प्रमाण काही प्रमाणात आहे, तर काही प्रमाणात डेंग्यू असूनसुद्धा लक्षणे दिसून उलट आहेत. नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा. थंड खाणे टाळावे, मच्छरदाणीचा वापर करावा, लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात जाणे महत्वाचे आहे.
-डॉ. दीपक शितोळे, सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल राहू