आंबेठण -कुरकुंडी ग्रामपंचायतीमध्ये मागील महिन्यापासून खडी मशीन चालविण्याबाबत पाच कुटुंबीयांचे अर्ज आले होते; मात्र ग्रमसभेत तब्बल 90 टक्के नागरिकांनी खडी मशीनला विरोध दर्शविल्याने हे पाचही अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच या पुढे कुरकुंडी गावामध्ये कधीही कुणाचेही खडी मशीनचे अर्ज कायमस्वरूपी स्वीकारणार नाही, असे इतित्वृत्तामध्ये नमूद करण्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
कुरकुंडी ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये 100 पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.; परंतु ग्रामसभे मध्ये खाडीमशीन हा वादाचा मुद्दा ठरणार होता, त्यामुळे पाईट पोलीस दूरक्षेत्रातील रांगडे व सुनील मोरे यांनी तत्परता दाखवत पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामपंचायतचे कामकाज हे सरपंच सागर जावळे व उपसरपंच काळूराम उर्फ सुधीर राळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ग्रामसभेत खडी मशीन आलेले अर्ज मोठ्या संख्येने विरोध करण्यात आले व सर्वांनी सह्याची मोहीम आखून कागदावर आपले नाव व स्वाक्षरी करून विरोध दर्शविला.
ज्यांचा विरोध आहे त्या नागरिकांनी हातवर करून मते घेण्यात आली. 90 टक्क्यांपेक्षा नागरिकांनी हातवर करून विरोध दर्शविला. तसेच गावकऱ्यांना “गाव वाचवा शेती वाचवा’ असा आवाज ग्रामसभेमध्ये एक मुखाने मांडण्यात आला ग्रामसभेचे सचिव तथा ग्रामसेवक सुनिता चौधरी यांच्याकडे देण्यात आले. कुरकुंडीमध्ये कायमस्वरूपात खडी मशीनचे प्रकल्प यापुढे कधीही होणार नाही यासाठी विशेष सहकार्य देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नितीन भोकसे, रणजित भोकसे यांचे नागरिकांनी विशेष आभार मानले.