सातारा – सातारा एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या ईएसआय हॉस्पिटलसाठी एमआयडीसीमधील पाच एकर जागा दिली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर येथील बैठकीत दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर विभाग यांच्यावतीने सातारा, सांगली व कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या व अडीअडचणीबाबत औद्योगिक असोसिएशन पदाधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी श्री. सामंत बोलत होते. सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या महत्वपूर्ण विषयाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील उद्योजकांच्यावतीने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराचे (मास) अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी प्रश्न, समस्या मांडल्या.
जिल्ह्यामध्ये कर्मचारी राज्य बीमा निगम (ईएसआय) विभागाचे हॉस्पिटल किंवा संलग्न केलेले हॉस्पिटल उपलब्ध नसल्यामुळे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र शासनाने जिल्ह्यासाठी 100 बेडचे कर्मचारी राज्य बीमा निगम हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्यासाठी त्यांना सातारा औद्योगोक क्षेत्रालगत 5 एकर जागेची आवश्यकता आहे. सातारा औद्योगिक क्षेत्रातील शासकीय जागा या हॉस्पिटलसाठी द्यावी अशी मागणी श्री. मोहिते यांनी केली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी दिले. सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये महावितरणचे नवीन उपकेंद्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून महावितरणला हे सबस्टेशन उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये फक्त 60 आर जमीन हवी आहे. याबाबत श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून मास पदाधिकाऱ्यांनी सुचवल्यानुसार लवकर कार्यवाही करण्याबाबत मंत्री सामंत यांनी सांगितले. सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योगवाढीस जागा उपलब्ध नसल्याने उद्योजकांना त्यांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे बाहेर स्थलांतर करावे लागत आहे. औद्योगिक वसाहतीलगतच्या देगाव, निगडी व वर्णे गावातील अनेक शेतकऱ्यांनी पडीक व डोंगराळ जमीन औद्योगिक विकासाकरिता देण्यासाठी
अनुकूलता दर्शवली आहे. या जमिनीचा उपयोग उद्योगवाढीसाठी करता येऊ शकेल. तरी शासनाने ज्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. त्यांची जमीन योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करून औद्योगिक वसाहतीकरिता विकसित करावी, अशी मागणी यावेळी राजेंद्र मोहिते यांनी केली. याबाबत श्री. सामंत यांनी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सातारा यांना महसूल विभागाची मदत घेऊन त्वरित कार्यवाही करण्याची सूचना केली. सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना उद्योगामधून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे.
संबंधित विभागातील कचरा ग्रामपंचायतीनी जमा करावयाचा आहे. ग्रामपंचायत कचरा जमा करत नसेल तर त्यांना जमा होणारा 50 टक्के ग्रामपंचायत कर देण्यात येणार नाही. त्याबाबत स्थानिक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व एमआयडीसी अधिकारी यांनी मिटिंग घेऊन सदरचा विषयाचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मंत्री सामंत यांनी केल्या. सातारा व अतिरिक्त सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही किंवा केव्हा सुरु होईल याबाबतची ठोस माहिती एमआयडीसी कार्यालयाकडून मिळत नाही.
याबाबत उदय सामंत यांनी सांगितले की, याबाबतची फाईल माझ्याकडे आली असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होती. पण त्याबाबत लवकरच कार्यवाही करुन एमआयडीसीमधील रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील ट्रक रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. त्याअनुषंगाने सातारा जुन्या एमआयडीसीमधील ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेली जागा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराला (मास) ट्रक पार्किंग सुविधेसाठी देण्यात यावी. त्याप्रमाणे एमआयडीसी कार्यालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनसाठी राखीव जागेवर एमआयडीसी कडून इमारत बांधून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. राजेंद्र मोहिते यांनी जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्री सामंत यांना सातारा दौऱ्याचे निमंत्रण दिले. यावेळी मासचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशील भोसले व मास माजी अध्यक्ष उदय देशमुख उपस्थित होते.