– रामचंद्र सोनवणे
राजगरूनगर – खेड तालुक्यात 23 ग्रामपंचातींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या सर्व गावात लोकनियुक्त सरपंच होणार आहेत, त्यामुळे गावातील राजकीय वातावरण आता चांगले तापू लागले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील चाकण आळंदी आणि राजगरूनगर या तीन नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर अवलंबून असणारी तालुक्यातील सर्वांत महत्त्वाची आणि अनेकांचे राजकीय अस्तित्व टिकवणारी बाजार समितीची निवडणूक असल्याने या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला मोठे महत्त्व आले आहे.
खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द, भांबोली, बहुळ, बहिरवाडी, वाडा, मांजरेवाडी, मिरजेवाडी, शेलगाव या गावांमध्ये लोकनियुक्त सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले असल्याने मोठी चुरस लागली आहे. या बहुतेक गावातील लोकनियुक्त सरपंच महिलाचे पतीराज काम पाहणार असल्याचे चित्र आहे. अनेकांनी आपापल्या सरपंच पदासाठी इच्छुक असल्याबाबत पत्नीचे बॅनर गावातील चौकाचौकांत लावले असून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने यावेळीच्या निवडणुकीत मोठी चुरस लागली आहे. अनेकांनी देवदर्शन सहली, पैठणी, सांस्कृतिक कार्यक्रम, वाढदिवस धुमधडाक्यात साजरे केल्याने या निवडणुकांमध्ये रंग भरला आहे.
लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी असलेल्या सिद्धेगव्हाण, येलवाडी, चास, दौंडकरवाडी, पापळवाडी, साबळेवाडी, या गावांमध्ये मोठी चुरस लागली आहे. उर्वरित शिरोली (अनुसुचित जाती), येणिये खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), देवोशी (अनुसूचित जमाती महिला), अनावळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), आंभु (अनुसूचित जाती महिला), आव्हाट (अनुसूचित जमाती महिला), सुरकुंडी (अनुसूचित जमाती महिला),
साकुर्डी (अनुसूचित जमाती महिला), गारगोटवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) येथे आरक्षण आल्याने येथील निवडणुकाही चुरशीच्या होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा परिणाम आमदार, खासदार व नगरपरिषदा यांच्या निवडणुकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होतो कारण या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण होते तर ग्रामपंचायत निवडणुकीतून एकगठ्ठा मतदान इतर निवडणुकांमध्ये मिळत असल्याने ग्रामपंचायतही नेत्यांसाठी तितकीच महत्त्वाची असल्याने नेते मंडळी या 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींवर लक्ष ठेवून आहेत.
“त्या’चा फायदा राष्ट्रवादीला?
खेड तालुक्यात नुकात्याच सुमारे 90 पेक्षा जास्त सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. याच काळात तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना यांचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्चस्व सध्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. शिवसेना भाजप या दोन पक्षांची स्वतंत्र ताकद असल्याने या दोन्ही पक्षात स्पर्धा आहे तर शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये शिवसैनिक विभागाल्याने याचा फायदा भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
तरी तालुक्यात चर्चा
वाडा, येलवाडी, चास, दौंडकरवाडी, बहुळ, मांजरेवाडी मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. 192 महसुली गावांपैकी 23 गावाच्या निवडणुका होत असल्या तरी त्याची चर्चा तालुक्यातील 3 नगरपरिषदा आणि 192 महसुली गावांमध्ये सुरू आहे.
पडद्यामागून लक्ष
खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळी सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच बाजार समिती निवडणूक रिगंणातील इच्छुकांनी या निवडणुकीत आपल्या विचारांचे सदस्य निवडून यावेत यासाठी पडद्यामागून लक्ष ठेऊन छुप्या पद्धतीने हातभार लावण्यात पुढाकार घेतल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहे.