पुणे – राज्यातील शासकीय व खासगी संस्था, आस्थापनांनी कामगारांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी भरपगारी सुट्टी किंवा दोन ते तीन तासांची सवलत द्यावी लागणार आहे. अन्यथा संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
देशाने लोकशाही पद्धत स्विकारली असून १८ वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था, आस्थापना हा नियम पाळत नाहीत. याच कारणातून मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.
राज्यात दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे, दि. २० मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या खासगी कंपन्या, आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांना सुट्टी लागू राहणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने आदेश जारी केले आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, अशा अस्थानांना संबंधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे