पुणे – “शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेचे नुकसान झाले. मात्र, ते ताटातून वाटीमध्ये गेले असेच म्हणावे लागेल,’ अशी टिप्पणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. गोऱ्हे बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर बोलताना त्या म्हणाल्या, “महायुतीमध्ये प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील असे नसते. सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रीय पक्षाला विचारून काही गोष्टी कराव्या लागतात, तडजोड करावी लागते. याचा अर्थ दबाव आहे, असे म्हणता येत नाही. यापूर्वीही युतीमध्ये अशा प्रकारच्या तडजोडी झाल्या आहेत.’
पुणे लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उमेदवार दिल्यामुळे पुण्यातील लढत तिरंगी होईल का, यावर डॉ. गोर्हे म्हणाल्या, गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पहिले काही दिवस दिसतो. मात्र, मतदान जवळ येईल तसा प्रभाव कमी होत जातो. त्यामुळे पुण्यात महायुती व महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होईल. तर बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार विजयी होतील. जेथे माझी गरज असेल तेथे मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे.’