पुणे, दि. 1 -केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सहसचिवांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) रुपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा दिलेला आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे रुपी बॅंक अवसायनात निघाली असून बॅंकेवर अवसायक म्हणून साखर आयुक्तलयातील प्रादेशिक सह संचालक धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती केली आहे. डोईफोडे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
रिझर्व्ह बॅंकेने दि. 8 ऑगस्ट रोजी रुपी बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार 22 सप्टेंबरपासून रुपी बॅंक अवसायनात काढण्यात येणार होती. या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यासाठी बॅंकेने अर्थ सहसचिवांकडे अपिल केले होते. तसेच उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती. “केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सहसचिवांसमोर दाखल अपिलावर 17 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, तोपर्यंत रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाला स्थगिती असेल,’ असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.
त्याविरोधात रिझर्व्ह बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यानुसार, केंद्रीय अर्थ सहसचिवांनी सुनावणी घेत सोमवारी बॅंकेचे अपील फेटाळले. त्यानुसार आता अवसायक म्हणून डोईफोडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्थिक अनियमितेमुळे व गैरव्यवहारांमुळे रुपी बॅंकेवर आरबीआयने दि.22 फेब्रुवारी 2013 रोजी आर्थिक निर्बंध लागू केले. तेव्हापासून रुपी बॅंकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. “रुपी बॅंकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही, यामुळे बॅंकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम नुसार तरतुदींचे पालन होत नाही. बॅंक सुरू ठेवणे आणि ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे. सध्याची बॅंकेची आर्थिक स्थिती पाहता तिच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बॅंकेला बॅंकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होईल,’ असे कारण देत आरबीआयने रुपी बॅंकेचा बॅंकिंग परवाना रद्द केला.
ठेवीदारांना पैसे दिले जाणार?
थकीत कर्जाची वसुली झाल्यानंतर पहिल्यांदा ठेव विमा महामंडळाने 5 लाखांच्या आतील खातेदार-ठेवीदारांना वाटप केलेली रक्कम बॅंक महामंडळाला अदा करेल. त्यानंतर राहिलेली रक्कम आणि होत असलेली वसुली यावरून पाच लाखांपुढील ठेवीदारांना किती रक्कम द्यायची याचा निर्णय घेऊन त्यानुसार रकमेचे वाटप केले जाईल, अशी माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.
आता पुढे काय?
रुपी बॅंकेवर अवसायक नेमण्यात आला आहेत. त्यामुळे अवसायक सुरुवातीस थकीत कर्जांची वसुली करणे, पैसे किती येणे आहे तसेच देणे किती आहे, याची आकडेवारी अंतिम करतील. बॅंकेच्या मालमत्ता किती, जमीन किती, यांची माहिती जमा केली जाईल. बॅंकेचा खर्च कमी करून व्यवस्थापन खर्च कमी कसा करता येईल, यावर भर दिला जाणार आहे. कर्जाची वसुली करणे, मालमत्तांचा लिलाव करून कर्जाची वसुली करणे, त्याचा हिशेब ठेवला जाणार आहे.