पुणे, दि. 1 – कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आर्थिक प्रतिकूलतेतही कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पारंपरिक खाद्यान्न शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.
वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत “फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, कृषी आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.
तोमर म्हणाले, सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी. यासाठी सुविधा देण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून नवी पिढी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आकर्षित होत आहे. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशाला कृषी क्षेत्रातील अग्रणी राष्ट्र बनविता येईल. कृषी क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. सत्तार यांनी नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना समृद्धीकडे नेता येणार असल्याचे सांगितले. भुमरे यांनी फलोत्पादन क्षेत्रात 35 टक्के नासाडी होते, ती रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजनांची गरज असल्याचे नमूद केले.
फलोत्पादनात महाराष्ट्र अव्वल
फलोत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशातून यावर्षी 342 दशलक्ष मेट्रिक टन एवढी विक्रमी निर्यात करण्यात आली. परंतु या क्षेत्राला अधिक चालना देशात 55 क्लस्टर विकसित करण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय सचिव मनोज आहुजा यांनी दिली.