पुणे, दि. 1 – शहरालगत पीएमआरडीएची हद्द आहे. तेथेही पीएमपी बस धावत आहेत. त्यामुळे संचलन तुटीची मागणी पीएमपी प्रशासनाने “पीएमआरडीए’कडे केली आहे. पण, पत्र देताना किती किलोमीटर संचलन होते, किती उत्पन्न मिळते, किती खर्च होतो, किती प्रवासी असतात? ही माहितीच पीएमपी प्रशासनाकडे नाही. त्यामुळे संचलन तूट कशाचा आधारावर मागितली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पीएमपीचा आढावा घेतला. या बैठकीत वाढत्या संचलन तुटीसंर्भात चर्चा झाली. यात पालकमंत्र्यांनी दोन्ही महापालिकांप्रमाणे पीएमआरडीनेही संचलन तुटीचा काही हिस्सा उचलावा, अशा सूचना दिल्या. त्यासाठी पीएमपीच्या वाहतूक नियोजन विभागाला ही माहिती गोळा करण्याचा सूचना देण्यात आल्या. पण, मागील आठ दिवसांत वाहतूक विभागाने 478 बस 105 मार्गांवर धावत असल्याची माहिती दिली आहे. पीएमपी प्रशासनाने या माहितीच्या आधारे “पीएमआरडीए’कडे संचलन तुटीचा हिस्सा मागितला आहे. पण, यावरून “पीएमआरडीए’ हद्दीत किती प्रवासी प्रवास करतात? किती तोटा सहन करावा लागत आहे? या प्रकारची कोणतीही ठोस माहिती पीएमपी प्रशासनाकडे नसल्याचे उघड झाले आहे. “पीएमआरडीए’समोर केवळ मार्ग आणि बसच्या संख्येवरून पीएमपीला होणारा तोटा कसा ठरवायचा? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
तकलादू पत्र
पुणे आणि पिंपरी-चिचवड महापालिकांकडे संचलन तुटीची मागणी करताना पीएमपी प्रशासन प्रवासी संख्या, मार्ग, प्रत्येक किलोमीटरचा खर्च, उत्पन्न, तोट्यातील मार्ग, तिकीट विक्री, पास विक्री अशा स्वरुपाची माहिती आकडेवारीसह देते. मात्र, पीएमपीच्या वाहतूक विभागाकडे “पीएमआडीए’ हद्दीतील संचलनाची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे, “पीएमआडीए’ला तकलादू स्वरुपात पत्र पाठवून कशाच्या आधारावर तूट मागणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.