पुणे – शहरासह जिल्ह्यातील डोळ्यांची साथ आता हळूहळू ओसरत असून, जिल्ह्यात 70 हजारांपैकी 52 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर पुणे शहरात 13 हजारांपैकी 10 हजार रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, डोळे आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये आणि नागरिकांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
शहर परिसरात डोळ्यांची साथ लवकरच आटोक्यात येईल, असे मनपा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला पुणे जिल्ह्यात आळंदी आणि खेड परिसरात रुग्ण आढळले होते. त्यानंतर जिल्हाभर प्रादुर्भाव वाढला. घरोघरी सर्वेक्षणास सुरुवात झाली. तसेच आकडेवारीही अपडेट केली जाऊ लागली. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ओपीडी सुरू करण्यात आली.
औंध, बाणेर, वडगावशेरीत सर्वाधिक रुग्ण
वातावरणातील बदल, ऍडिनो आणि एंटेरो विषाणूमुळे डोळ्यांचा संसर्ग होतो. मात्र, संसर्ग सौम्य असल्याने त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे पाच ते सहा दिवस रुग्णाला डोळे लाल होणे, सूज येणे, पापण्या चिकटणे, पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. पाच-सहा दिवसांनी रुग्ण बरा होतो. काही बाबतीत डोके दुखणे, डोळे सुजणे अशी लक्षणे दिसतात. सध्या औंध-बाणेर, नगर रस्ता-वडगावशेरी भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
“शहरात 269 शाळांमध्ये 64 हजार 873 मुलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 2,067 विद्यार्थ्यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे आढळले. मुलांना डोळ्यांशी संबंधित त्रास आढळून आल्यास मुलांना ताबडतोब घरी पाठवावे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार द्यावेत.” – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका