पुसेसावळी – लाडेगाव व वांझोळीनजीक पुनर्वसन झालेल्या रेवली या गावातील गणेशमूर्ती आता खटाव तालुका व सातारा जिल्हा नव्हे तर मुंबई, हैदराबाद, पुणे, बेळगाव, सांगली, बारामती या शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्रीस जात आहेत. खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात पुनर्वसन झाल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला.
आपल्यातील कलागुणांना वाव देत याच भागात गणेशमूर्ती तयार करण्याचा उद्योग साळुंखे बंधुंनी सुरु केला. तालुक्यातील गणेशभक्तांच्या पाठबळाने या व्यवसायाला उभारी व आर्थिक सक्षमता आली, असे मूर्तीकार चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले. मोहन साळुंखे व चंद्रकांत साळुंखे यांनी सुरवातीस छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु केला होता. आता येथे एक ते 15 फूट उंचीपर्यंतच्या आकर्षक गणेशमूर्ती डोळयांचे पारणे फेडतात. यात लालबागचा गणपती, दगडू शेठ हलवाई, टिटवाळा,चिंतामणी, लंबोदर, वक्रतुंड, मोरेश्वर, बल्लाळेश्वर, सिद्धीविनायक अशा अनेक रुपातील मूर्ती नजरेस पडतात. यावर्षी दरात वाढ 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसची कमतरता व रंगाच्या दरातील वाढ, मूर्ती सजविण्यास लागणारे कापड, कलाकुसरीचे दागिने यांच्या दरातील वाढही याला कारणीभूत आहे. त्यांनी जवळपास 5500 मूर्तीं तयार केल्या आहेत. त्यासाठी दररोज 25 कारागिरांचा राबता आहे. मे महिन्यापासून मूर्ती तयार करण्याचे कामकाज सुरु आहे. वर्षभरात सुमारे 10 महिने कामकाज चालते. त्यानंतर लगेच दुर्गादेवीच्या मूर्तींचे काम सुरु होते.सुरवातीपासूनच आजी- माजी फौजींना किंमतीत सूट दिली जाते, असे चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले.