कल्याणी फडके
पुणे – मागील वर्षीपासून प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्यात अनिश्चितता आली आहे. या सगळ्यात तरुण वयोगट तुलनेने अधिक भरडला आहे. ऑनलाइन शिक्षण, बेरोजगारी, नातेवाईक आणि समाजाची टिप्पणी आणि या सगळ्यात वाढणारा ताण अशा भावनांची सरमिसळ तरुणाईच्या मनात आहे. परिणामी नैराश्यदेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, या सगळ्यातून बाहेर पाडण्यासाठी तरुणाईने स्वत:हून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे समुपदेशक सांगतात.
करोनाचा प्रसार मागील वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झाला. त्यानंतरचे लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे दैनंदिन जीवनात अनेक बंधने आली. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून लाखो जणासमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. यात प्रामुख्याने 16 वर्षांपुढील तरुणाईवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे चित्र आहे.
मागील वर्षभरापासून “ऑनलाइन’ शिक्षणाचा नवा पायंडा पडला. मात्र, ऑनशिक्षण घेताना ते समजावून घेण्यात विद्यार्थ्यांचा कस लागत आहे. याशिवाय शिक्षण पूर्ण झालेल्यांसमोर नोकरीचे काय, असा प्रश्न सतावू लागला आहे.
इतकेच नव्हे तर, ऑनलाइन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकाकडे आणि पदवीकडे समाज कसा बघेल याचीही साशंकता विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पर्यायाने यामुळे मानसिक आणि शारीरिक बाबींवर होत असून, नकारात्मकता, चिंता आणि नैराश्य वाढत आहे.
याकडे लक्ष द्यायला हवे…
आपला मानसिक ताण आपल्या हातात आहे. वेळेचे अनियोजन, अस्ताव्यस्त दिनचर्या हे आवर्जून टाळले पाहिजे. नित्य नेटका दिवस असल्यास, नक्कीच उत्साह राहील. “सकाळी लवकर उठा’ असे म्हणणे कितपत बरोबर आहे माहीत नाही. परंतु हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. व्यायाम, योग्य आहार, वेळेत अभ्यास आणि वेळेत झोप याकडे लक्ष दिले पाहिजे. “डिजिटली’ अधिक जोडले गेलो असल्याने घरात बोलका संवादच नाही असे व्हायला नको, असे समुपदेशक सांगतात.
तरुणाई म्हणते…
महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, करिअरमध्ये कसे सेट व्हायचे हे साधारणपणे 20 ते 22 वर्षांच्या मुलांचे ठरलेले असते. पण, सध्या 2 वर्षे वाया जात आहे. एकदम नैराश्य नाही पण चिंतेचे वातावरण सर्वच तरुणाईमध्ये आहे. मुख्यत्वे नोकरीचे साधन उपलब्ध नसल्याने मध्यमवर्गीय मुलांमध्ये कमालीची चिंता आहे. याशिवाय उच्च शिक्षणानंतर देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने, भविष्यात देखील उपलब्ध होणाऱ्या संधीबाबत अनिश्चितता आहे.
– महेश आकोलकर
सध्या विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. एक वर्ष ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मात्र, थिअरी विषय येतात. परंतु, प्रॅक्टिकलमधील काहीच येत नाही. येत्या काळात “फील्ड’वर थिअरी’ अधिक उपयुक्त ठरणारी नाही. याशिवाय या कालावधीत “प्लेसमेंट’ मिळाल्या नसल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. यामुळे जीवनातील 2 वर्षे व्यर्थ गेली का, असा प्रश्न काही वेळा पडत आहे.
– चंद्रशेखर लोंढे
लहान मुले आणि तरुणांमधील नैराश्य वाढत आहे. सध्या सगळ्याच बाबींमध्ये अनिश्चितता असल्याने, मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. काही जण किमान “वर्क फ्रॉम होम’ करू शकत आहेत. मात्र अनेकांचा पूर्ण वेळ रिकामा आहे. कोणतेही काम नाही आणि शिक्षण देखील थांबले आहे, अशांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर हातामध्ये असणाऱ्या गोष्टी करणे, ठराविक पद्धतीचे वेळापत्रक निश्चित करणे, वेगवेगळी कौशल्ये शिकणे आदी गोष्टी करता येऊ शकतात. नैराश्याची अनेक लक्षणे न कळण्यासारखी आहेत. त्यामुळे पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांमधील घडणारे बदल टिपून, आवश्यक ठिकाणी मदत करणे अत्यंत आवश्यक आहे.
– गौरी जानवेकर, मानसोपचार तज्ज्ञ
करोनामुळे मागील एक वर्ष आणि सध्याचे एक वर्ष आणि चालू वर्ष विद्यार्थी, पालक आणि सगळ्यांसाठी खूप जास्त कठीण आहे. शाळा, पदवीनंतरचे शिक्षण आणि शेवटच्या वर्षी झालेली “प्लेसमेंट’ या सगळ्यातच खूप अडचणी पाहायला मिळत आहेत. परीक्षा कशा होणार, कधी होणार यापासून ते थेट वरच्या वर्गात गेलो, अशी अचानक आलेली फेज मुलांनी अनुभवली. यात प्रचंड मानसिक ताण आणि पर्यायाने शारीरिक ताण पण निर्माण झाला आहे. या सगळ्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघण्याची गरज वाटते. ऑनलाइन शिक्षण पद्धती आता अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे नव्याची कास आणि जुन्याची ओढ असे यातून घ्यायला हवे. एकूणच ही परिस्थिती स्वीकारून चांगले “आऊटपुट’ कसे मिळेल, हे पाहायला हवे.
– लीना घारपुरे, मानसोपचार तज्ज्ञ