रांजणगावमध्ये भीषण पाणीटंचाई : पाणी देण्याची मागणी
रांजणगाव गणपती – कोंढापुरी (ता. शिरुर) येथील मल्हार तळ्यातील पाणीसाठा संपल्यामुळे रांजणगाव गणपती येथील पाणी पुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव येथील नागरीवस्तीला रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सरपंच सर्जेराव खेडकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विभागाच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील उपअभियंत्यांना केली आहे.
पावसाने गेले महिनाभरा पासून ओढ दिल्याने व कोंढापुरी येथील मल्हार तळ्यात चासकमान कालव्याचे पाणी सोडण्यासाठी धरसोडपणा झाल्यामुळे तळ्यात सध्या पाणीच शिल्लक नाही. मात्र, आजमितीस रांजणगाव गणपती येथील लोकसंख्या अंदाजे पन्नास हजारांच्या घरात पोहोचली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार रांजणगाव येथे वास्तव्यास आहेत. परिणामी रांजणगाव करांची पिण्याच्या पाण्याची व वापरण्यासाठीच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
याबाबत सरपंच सर्जेराव खेडकर, ग्रामपंचायत सदस्य विलास अडसूळ, ग्रामसेवक गंगाधर देशमुख, नंदू खेडकर यांनी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे. जर लवकरात लवकर पाणी उपलब्ध करुन दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच खेडकर यांनी दिला आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठा विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करुन पाण्याच्या नियमिततेबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उच्चदाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात आली आहे. याबाबत रांजणगाव औद्योगिक मंडळाच्या पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. कोंढापुरी येथील तलावाची पाहणी करण्यात आली असता तलावातील पाणी संपल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सरपंच खेडकर यांनी केले आहे.