कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी सोडल्यास टंचाई
नारायणगाव – कालवा समितीच्या निर्णयानुसार जुन्नरच्या हक्काचे पाणी राखून न ठेवल्यास नारायणगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेनुसार नारायणगाव शहरासाठी दररोज 11 लाख लिटर पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्याला पाणी सोडलेले असले तरी नारायणगावकरांना सहजतेने पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची अडचण आली नाही; परंतु चालू वर्षी नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्याने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी येडगाव धरणातून जॅकवेलच्या माध्यमातून नारायणगावकरांना दररोज 23 लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. सध्या वैद वस्ती व नारायणवाडी येथील नवीन पाणी योजना बंद असल्याने 17 लाख लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. योजना नवीन असल्याने चालू वर्षी पिण्याच्या पाण्याचा किती तुटवडा भासेल याचा अंदाज आलेला नाही.
माजी सरपंच योगेश पाटे म्हणाले की, कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी सोडल्याने पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात आमदार अतुल बेनके, आशा बुचके यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून पाणी नोंदणी केली तर आपल्या हक्काच्या पाण्यासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. पाणीसाठा राखीव ठेवण्यासाठी आपला हक्क अबाधित ठेवला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले नाही; परंतु यावर्षी कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी अहमदनगरला सोडले तर नारायणगावकरांना पिण्याचे पाणी कमी पडणार आहे. तसे झाले तर पाणी प्रश्नासाठी एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभे करू.
– योगेश पाटे, माजी सरपंच,नारायणाव