शिरूरमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल : आंदोलन करण्याची वेळ
सविंदणे – कारेगाव (ता. शिरूर) येथे सुरू असलेली पीएमपीएमएल पुढे शिरुरपर्यंत सुरू करावी, यासाठी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. शिरूरचे आमदार अशोक पवार यांनीही पालकमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन केलेल्या मागणीला देखील दीड वर्षे उलटून गेले तरी शिरूरच्या पवारांच्या पत्राची दखल बारामतीचे पवार घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरूरला पीएमपीएमएलसुरू करा; अन्यथा नागरिक व विद्यार्थी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.
शिरूर शहराला लागून मोठी औद्योगिक वसाहत आहे. करडे घाटात अजून नव्याने औद्योगिक वसाहत होत असल्याने तसेच शहरासह परिसरातील व शेजारील पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कर्मचारी, वयोवृद्ध तसेच विद्यार्थ्यांना रोज ये – जा करावी लागते. परंतु कारेगाव सोडले तर कारेगाव, फलके मळा, सरदवाडी, घावटे मळा, न्हावरे फाटा, बोऱ्हाडे मळा, बायपास आदी ठिकाणी एसटी बस थांबत नसल्याने सर्वांनाच मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
पुण्यावरून येताना शिरूर प्रवासी घेण्याचेही टाळत असल्याने अनेक जण संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. पीएमपीएमएल सुरू करणारच, असे आश्वासन देणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी आता तरी आग्रही भूमिका घेऊन दिवाळीच्या आधी शिरूरला पीएमपीएमएल सुरू करून दाखवून शब्द खरा करावा, असे बोलले जात आहे.
पाठपुराव्याकडे कानाडोळा
महिला, नागरिक, विद्यार्थी व वयोवृद्धांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनाही शिरूरपर्यंत पीएमपीएमएल सुरू करण्याबाबत पत्र देऊन मागणी केली होती. त्यामुळे शिरूरकरांची पीएमपीएमएलची प्रतीक्षा आता संपणार, असे वाटत होते. परंतु या मागणीला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, या मागणीला अद्याप यश आले नाही.