पुणे – पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शाळा-महाविद्यालये असणाऱ्या भागात प्रायोगिक तत्वावर अर्ध्या तासाने शाळांची व खासगी कार्यालयांच्या वेळ बदलून वाहतुकीवर होणारा परिणाम अभ्यासावा, अशी सूचना विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा डॉ. गोऱ्हे यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमपआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत अष्टविनायक विकास आराखडा सद्यस्थिती, एकविरा देवी शाश्वत विकास व पर्यायी रस्ता, आळंदी पाणी पुरवठा, शहरी भागातील वाहतूक कोंडी, मुळशी येथील अग्निशमन केंद्राची स्थिती, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रश्न, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि गडकिल्ले संवर्धनाचा आढावा घेण्यात आला. दुर्गप्रेमींच्या माहितीसाठी पुरातत्व विभागाने जिल्ह्यातील गडकिल्ले आणि स्मारक तसेच त्यांच्या संवर्धनात नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होण्यास मदत व्हावी यादृष्टीने याठिकाणी विकासकामांची माहिती संकेतस्थळावर द्यावी. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापन करावे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.