– माधव विद्वांस
आपल्या लेखनातून कोकणचे सुंदर वर्णन करणारे तसेच ललितलेखक म्हणून प्रसिद्ध रवींद्र पिंगे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 23 मार्च 1926 रोजी मुंबईच्या गिरगावातील कांदेवाडीतील केशवजी नाईकच्या चाळीत झाला. त्यादिवशी गुढीपाडवा होता. त्यांचे वडील रामचंद्र परशुराम पिंगे आणि आई सुभद्राबाई दोघेही प्राथमिक शिक्षक म्हणून मुंबईतील नगरपालिकेत काम करीत असत. कोकणातील खारेपाटण जवळील उफळे हे त्यांचे मूळ गाव. त्यामुळे त्यांची कोकणाशी नाळ घट्ट जोडलेली होती.
रवींद्र यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक शाळेत झाले. तेथे असतानाच त्यांचा लेखनाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी शाळेच्या हस्तलिखित मासिकाचे लेखन, संपादन केले होते. शालेय शिक्षण संपल्यावर ते वर्ष 1945 मध्ये विल्सन महाविद्यालयात दाखल झाले. तेथील ग्रंथालयात त्यांच्या वाचनाची हौस भागली. त्यांचे वाचन बहुविध झाले. वाचन चालू असतानाच त्यातील वाचनीय पुस्तकावर अभिप्राय लिहिणे, तसेच स्वतःचे स्फुटलेखन करणे चालूच होते. एकीकडे त्यांचा ग्रंथ संग्रहही वाढू लागला.
वर्ष 1955 मध्ये “मौज’ साप्ताहिकात त्यांनी युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहिली व लेखक म्हणून वाचकांना त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सुमारे 50 वर्षांत 40 ग्रंथ लिहिले. त्यांना प्रवासाचीही आवड होती त्यातूनच त्यांची प्रवासवर्णने साकारली. त्यांनी मौज, साधना, माणूस वीणा, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. वर्ष 1955 मध्ये नभोनाट्य लेखन स्पर्धेत त्यांच्या “महापूर’ या नभोनाट्याला पारितोषिक मिळाले. या नाट्याचे अनेक भाषांत भाषांतर झाले होते. त्यांचा “श्री अरविंदांच्या पॉंडेचरीत’ हा लेख सप्टेंबर 1957च्या “सत्यकथा’च्या अंकात प्रसिद्ध झाला आणि पिंगे यांचे नाव वाचकांसमोर ठळकपणे आले.
सुरुवातीस नौदलाच्या लेखाविभागात तसेच शासकीय रेशनिंग कार्यालयामध्ये नोकरी करीत असतानाच त्यांचे लेखनही चालू होते. रेशनिंग कार्यालयामध्ये नोकरी करीतच, अर्थशास्त्र विषय घेऊन ते बीए झाले. त्यानंतर मुंबई येथे त्यांना मंत्रालयात नोकरी मिळाली. तेथे पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर वर्ष 1965 मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून हजर झाले. या सेवेत मात्र ते रमले आणि एका आनंदाच्या विश्वात निवृत्तीपर्यंत राहिले. या कालावधीत आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक नाटिका लिहिल्या.
त्यांच्या साहित्य संपदेत “बकुल फुल’, “शतपावली’, “देवाघरचा पाऊस’, “दिवे लक्ष्मण दिवे’, “अत्तर आणि गुलाबपाणी’ हे लेखसंग्रह; “आनंदाच्या दाहीदिशा’, “आनंदव्रत’, “दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; “पश्चिमेचा पुत्र’, “पिंपळपान’, “हिरवीगार पानं’ ही पाश्चात्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; “परशुरामाची सावली’ ही कादंबरी; “प्राजक्ताची फांदी’ व “सुखाचं फूल’ हे कथासंग्रह; असे वैविध्यपूर्ण लेखन पिंगे यांनी केले. “साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते.
त्यांना अनेक सन्मान मिळाले. “परशुरामाची सावली’ला राज्यपुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना “कोकण साहित्यभूषण पुरस्कार’, “सोलापूरचा दमाणी पुरस्कार’, पुण्याच्या साहित्य परिषदेनेही त्यांना खास पुरस्कार दिला. त्यांच्या इंग्रजीत भाषांतर झालेल्या कथेला “दिल्लीच्या कथा’ वार्षिकाचेही पारितोषिक मिळाले. 17 ऑक्टोबर 2008 रोजी त्यांचे निधन झाले.