वाल्हे – मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असून कडाक्याची थंडीच्या दिवसात अवकाळी पावसांच्या हलक्या सरी कोसळल्याने वाल्हे (ता.पुरंदर) परिसरातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. मंगळवारी (दि. 9) पहाटे 5. 30 वाजताच अवकाळी पावसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने मात्र बळीराजाची चिंता वाढलीय.
दरम्यान, शनिवारी (दि. 6) जेजुरी, कोळविहिरे, जेजुरी औद्योगिक वसाहत या भागात सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. रविवारी (दि. 7) दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सोमवारी (दि. 8) कडाक्याचे ऊन पडले होते. मात्र, मंगळवारी (दि. 9) पहाटेपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी वाल्हे परिसरातील दौंडज, पिसुर्टी, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेऊर आदी परिसरात कोसळल्या.
अगोदरच पाणीटंचाईने चिंताग्रस्त असलेल्या शेतकरीवर्गावर आता या अवकाळी पावसाने पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच उभ्या पिकांना फटकाही बसून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
या पिकांना बसणार फटका
या अवकाळीमुळे कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांवर परिणाम होणार आहे. तसेच धुके आणि अवकाळीमुळे गहू पिकावर तांबेरा रोग पडण्याची शक्यता निर्णाम झाली आहे. तसेच हरभरा पिकांवर घाट आळी येण्याची शक्यता असते. कांदा आणि मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.
शेतकर्यांना बसणार फटका ?
मागील काही दिवसांपासून कडाक्यांची पडलेली थंडी अन् त्यानंतर येणार्या अवकाळी पवसाच्या सरी यामुळे शेतकर्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग धास्तावला आहे, विशेषतः वाल्हे व परिसरातील अंजीर उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतकर्यांचा गहू व हरभरा पिकांचे नुकसान होणार आहे, अशी चर्चा शेतकरीवर्गामध्ये आहे.