सातारा – सातारा जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटले असून, मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातही अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ हवामानाचा पिके आणि फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. किमान तापमान बहुतांश वेळा 15 अंशाच्या खाली रहात आहे. थंडीचा कडाका वाढल्याने ज्वारीसारख्या पिकावर चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर पिकांच्या वाढीवरही परिणाम झालाय. असे असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होत होते. त्यामुळे अवकाळी पाऊस पडणार, असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला असून, सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने हवामानात बदल झाला आहे.
सातारा शहरात मंगळवारी पहाटे अवकाळी पाऊस झाला. पाऊस रिमझिम पडला असला, तरी हवेत गारवा निर्माण झाला. या पावसामुळे मॉर्निंग वॉकला जाणार्यांची संख्या कमी झाली होती. शहरात सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ हवामानामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्याच्या अनेक भागात हलका पाऊस पडला.
अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि दाट धुके पडत असल्याने द्राक्षे, डाळिंबासारख्या फळबागांना फटका बसणार आहे. दीड महिन्यापूर्वीही झालेल्या अवकाळी पावसाने, फळबागांना मोठा फटका बसला होता. तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही या हवामानाचा परिणाम होऊन, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
अजिंक्यतारा न्हाला धुक्यात
शहर आणि परिसरात मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे दाट धुके पसरले होते. पहाटे काही अंतरावरीलही दिसत नव्हते. अजिंक्यतारा किल्लाही धुक्याने वेढला गेला होता. किल्ल्यावर सकाळी 11 वाजेपर्यंत दाट धुके दिसत होते. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी होत गेली.